सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
महाविकास आघाडी सरकारने शेतीपंपांचा वीजपुरवठा अनेक दिवसांपासून खंडित केला असल्याने शेतीपिक धोक्यात आले आहे, सक्तीच्या वीज बिल वसुलीमुळे शेतकरी मानसिक तणावाखाली आला आहे. इंदापूर तालुक्यात वीजेअभावी जळून चाललेली शेती पिके वाचवण्यासाठी शेती पंपांचा वीजपुरवठा तात्काळ चालू करावा, ही मागणी घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे मैदानात उतरले असून त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर येथे आज सकाळी साडेदहा वाजता पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन होणार आहे. व्यापक स्वरूपात होणा-या आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वीजेच्या आगीचा भडका उडणार असल्याचे दिसून येत आहे.
या आंदोलनामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
मंत्र्यांकडून वीज तोडण्याचे आदेश दिले जात आहेत. शेतकऱ्यांना मोफत वीज द्या म्हणणारेच सध्या सत्तेवर आहेत, तेच आता बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा चुकीच्या पद्धतीने खंडित करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या वीज तोडणी मोहिमेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन होणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना मदत करणे, आधार देणे हे राज्य शासनाचे कर्तव्य असते. मात्र शेतकर्यांना खिंडीत गाठून, पिके जाळून व शेतकऱ्यांचे नाक-तोंड दाबून सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार शेतीपंपांची वीज बिल वसुली जबरदस्तीने कोणताही नियम न पाळता करीत आहे हे निषेधार्ह आहे.
इंदापूर तालुक्याच्या शेजारील तालुक्यांमध्ये शेतीचा वीजपुरवठा सुरू आहे, मग इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय का? इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेल्या मंत्र्यांचा वीज तोडणी मोहिमेला पाठिंबा आहे. त्यामुळे ते वीज पुरवठा सुरु व्हावा, संदर्भात एकही शब्द बोलत नाहीत, मुग गिळून गप्प आहेत. महावितरणने शेतकऱ्यांना दिलेली बिले अव्वाच्या सव्वा आलेली असून अनेक हॉर्स पावरने वाढवून आलेली आहेत, त्यातच वीज पुरवठा खंडित केल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, याची जाणीव झाल्याने त्रस्त झालेला शेतकरी पेटून उठल्याचे पाटील यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी मंगळवारी होणाऱ्या इंदापूर येथील रस्ता रोको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार व शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी केले आहे