माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर सुरु केलेल्या परिसंवाद कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र भोर विधानसभा मतदारसंघात झालेल्या परिसंवाद कार्यक्रमात पक्षश्रेष्ठींनी हजेरी घेतली असता कार्यकारिणी सदस्यांची संख्या खूपच नगण्य दिसून आली. यावर रुपाली चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली. तर नियोजनाचे अभाव तसेच अचानक वेळ आणि ठिकाण बदलल्याने कार्यकारणी सदस्यांना उपस्थित राहता आले नाही. तर काहीजण कार्यक्रमाबाबत अज्ञभिज्ञ असल्याची चर्चा होत आहे.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त शिवरे ( ता. भोर ) येथे नुकताच कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांशी सवांद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील व राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा चाकणकर यांनी यावेळी पक्ष वाढीसाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी युवक अध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविंकांत वर्पे, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, जि.प. उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा नियोजन सदस्य विक्रम खुटवड, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, सभापती लहुनाना शेलार, भालचंद्र जगताप, चंद्रकांत बाठे, भगवान पासलकर, शंकर भुरुक, निर्मला जागडे, सविता दगडे, राजाभाऊ हगवणे, भोर तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, वेल्हे तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, मुळशी तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे आदी उपस्थित होते.
रूपाली चाकणकर यांनी सर्व पदाधिकारी त्यांच्या व कार्यकारिणी मधील सदस्यांच्या उपस्थितीची हजेरी घेतली असता प्रत्येक कार्यकारणी कमिटीमध्ये उपस्थिती केवळ दोन, चार अशी नगण्य संख्या असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत पदे दिल्यांनतर कमिटी पदाधिकारी अलिप्त राहतात. कार्यकारणी सदस्यांना कार्यक्रमासाठी बोलावले होते. मात्र ते आले नसल्याची माहिती कार्यकारणी कमिटीच्या अध्यक्षांनी दिली. तर याबाबत आम्हाला कळविले नसतानाही खोटे खापर आमच्यावर कशासाठी फोडता ? असा सवाल अज्ञभिज्ञ असलेल्या कार्यकारणी सदस्य करत आहे.
जयंत पाटील म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात पवारसाहेबांना मानणारा वर्ग आहे. नागरिकांच्या समस्या सोडवून सातत्याने त्यांच्या संपर्कात राहिल्यास आपल्याला मतदानावेळी त्याची पावती मिळत असते. यासाठी बूथ कमिट्या सक्षम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भोर, वेल्हे, मुळशी मधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कानमंत्र दिला. यावेळी भोर मतदारसंघातील गटबाजीचा फायदा विरोधक घेत असून येणारी विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाला देण्याची विनंती चंद्रकांत बाठे यांनी केली. यावेळी या मागणीला सर्वांनी सहमती दर्शविली.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्ते फार नशीबवान आहेत, आपल्या पक्षाच्या नेत्यांना आपण कधीही भेटू शकतो. गडचिरोलीमधील कार्यकर्ते लांब असून पक्षाशी फार एकनिष्ठ आहेत. पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. पक्षाने सन्मानाने पद दिले आहे, त्याचा सन्मान राखला पाहिजे. महिलांनी सुद्धा उमेदवारीच्या वेळी त्यांना पर्यायच राहू नये, असे ताकदीने काम केले पाहिजे. पवार साहेबांचे ‘ राष्ट्रवादीमय महाराष्ट्र ‘ स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे त्यांनी आवाहन केले.