किशोर भोईटे
सणसर : महान्यूज लाईव्ह
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून बारामती येथील शिक्षक व आत्मप्रेरणा पुस्तकाचे लेखक लक्ष्मण जगताप यांचे वतीने व महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार कल्याण मंडळ पुणे जिल्हा ( ग्रामीण ) चे अध्यक्ष प्रकाश शिंदे यांचे सहकार्याने ऊसतोड कामगारांच्या मुलांना गोष्टीच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मराठी राजभाषा दिनाचे महत्व विशद करताना जगताप म्हणाले की, २७ फेब्रुवारी हा दिवस आपल्या मराठी मातृभाषेचा गौरव व कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचे संवर्धन व्हावं तिचं महत्त्व भावी पिढीच्या लक्षात यावे तसेच नवोदित लेखक कवी यांना मराठी साहित्याबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी राज्य शासन अनेक उपक्रम राबवित आहे व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. देशामध्ये बोलल्या जाणाऱ्या प्रमुख २२ भाषांपैकी बोलली जाणारी मराठी ही तिसऱ्या क्रमांकाची मराठी ही भाषा आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी पहिला राजकोष मराठी भाषेतूनच तयार केला व भाषेला राजाश्रय दिला. संत ज्ञानेश्वरांनी मराठीचा महिमा ओवी मधून विशद केला आहे. अनेक संतांनी मराठी भाषेतून विविध ग्रंथसाहित्य, भारुड, कथा लिहून प्राचीन काळापासून मराठी भाषा समृद्ध केलेली आहे . म्हणून केवळ कामकाजच नाही तर दैनंदिन व्यवहारातही आपण मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करायला हवा.
याप्रसंगी उपस्थित ५० मुलांना विविध लेखकांची गोष्टीची विविध पुस्तके वाटण्यात आली. पुस्तके हातात पडल्यावर मुले हरकून गेली. शाळा सोडून आपल्या आईवडीलांसोबत भवानीनगर साखर कारखान्याच्या परिसरात राहणाऱ्या आणि शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या मुलांना वाचनाची गोडी लागावी. शाळेचे महत्त्व कळावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षक अजिनाथ वाघमारे ,पाटोदा जि.बीड येथील ऊसकामगार मुकादम महादेव सरोदे ,सौताडा बीड येथील मुकादम राजेंद्र शिंदे उपस्थित होते.