माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
सध्या पीएमपीएमएलकडून कात्रजपासून थेट वेल्ह्याकडे बस सोडल्या जात आहेत. सध्या एसटीची सेवा बंद असल्याचे प्रवासी वाहतूकीचा मोठा भार हा पीएमपीएमएलवरच्या बसेसवर पडतो आहे. त्यामुळे या बसेसना उत्तम प्रतिसादही मिळत आहे. यामुळे वेल्हा तालुक्यातील लोकांची सोय झाली असली तरी या लोकांना वाटेत असलेल्या नसरापूर येथे थांबणे शक्य होत नाही. वेल्हा तालुक्यातील नागरिक हेच नसरापूर बाजारपेठेतील महत्वाचे ग्राहक आहेत. त्यांनाच येथे थांबण्यासाठी वेळ मिळत नसल्याने बाजारपेठेतील उलाढालीवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे पीएमपीएमएलने थेट वेल्ह्याकडे जाणाऱ्या बसऐवजी नसरापूरपर्यंत बस सोडाव्यात व नसरापूरहून वेल्ह्याकडे शटल सेवा सुरू करावी अशी मागणी वेल्हे तालुक्यातील सर्व थरातील नागरिक करीत आहेत.
यासाठी नसरापूरमध्ये डेपोला जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. डेपोसाठी जागा उपलब्ध होत असल्यास या मागणीला पीएमपीएमएल अधिकाऱ्यांनी देखील अशा व्यवस्थेसाठी संमती दर्शवली आहे.
या बससेवेमुळे वेल्हे तालुक्याच्या दुर्गम भागातून पुण्यात ये-जा करणाऱ्या चाकरमानी आणि विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. मात्र पीएमपीएलने नसरापूरमध्ये डेपो उभारून धावणाऱ्या बसचे वर्गीकरण करून वेल्हे, वांगणीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी काही बस थेट सोडाव्यात. काही बस नसरापूरपर्यंत सोडून येथून वेल्हे, वांगणीसाठी शटल सेवा सुरु करावी. जेणेकरून पुण्याहून येणाऱ्या वेल्हे तालुक्यातील प्रवाशांची जाताना देखील गैरसोय होणार नाही.
पीएमपीएमएलने नुकतेच विंझर मार्गावर धावणारी बसचे विस्तारीकरण करून थेट कात्रज सर्पोद्यान ते तोरणा ( वेल्हे ) अशी नवीन धावणारी बस सुरु केली आहे. या बसमधून वेल्हेपर्यंत असणाऱ्या सर्व थांब्यावर प्रवाशांची चढ – उतार होत असते. वेल्हे मार्गावरील अनेक गावातील ग्राहक आणि नसरापूर येथील दुकानदारांची आर्थिक व्यवहाराची नाळ कायम राहिली आहे. तसेच व्यापारी आणि शेतकऱ्यांचे संबंध चांगले असल्याने येथील व्यापारी शेतकऱ्यांना अडीअडचणीच्या काळात उधार उसनवारी देऊन सहकार्य करत असतात. तसेच रास्त भाव असल्याने ग्राहक नसरापूर मध्ये खरेदीला पसंती देतात. मात्र थेट गावापर्यंत जाणारी बस सोडली तर पुन्हा बस लवकर मिळणार नाही या भावनेमुळे ग्राहक नसरापूर येथे इच्छा असताना देखील खरेदी-विक्रीसाठी थांबत नसल्याने येथील बाजारपेठेवर आर्थिक परिणाम होऊ लागले आहे.
भोर आणि वेल्हा तालुक्याची मध्यवर्ती नसरापूर बाजारपेठ म्हणून ख्याती आहे. येथील बाजारपेठेत तांदूळ मिळण्यासाठी प्रसिद्ध असून शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला उपलब्ध होत आहे. तसेच विविध प्रकारची हॉटेल, होलसेल किराणा, अनेक बँका, दवाखाने, मेडिकल, कपड्यांची दुकाने, सर्व प्रकारचे बांधकाम साहित्यासह इतर मुलभूत सुविधा सहज उपलब्ध होतात. मात्र थेट लांब पल्ल्याची बस असल्याने जादा वेळ बस थांबत नाही. यामुळे आर्थिक उलाढालीवर परिणाम होत आहे. यासाठी व्यापारी वर्गासह स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत आणि पीएमपीएमएल यांनी तोडगा काढून नसरापूरमध्ये बस डेपो उभारल्यास वेल्हे तालुक्यातील आणि परिसरातील शेतकरी वर्गासह ग्राहकांना येथील बाजारपेठेत खरेदी विक्री करता येईल.
बाईट – ‘जागा उपलब्ध नसल्याने नसरापूरपासून इतर ठिकाणी संचलन करण्यासाठी अडचण होत आहे. स्थानिक प्रशासनाने डेपोला जागा उपलब्ध करून दिल्यास दोन टप्प्यात बस सोडली जाईल’
- दत्तात्रय झेंडे, मुख्य वाहतूक निरिक्षक पीएमपीएमएल.