वाई : महान्यूज लाईव्ह
येत्या २२ मार्चला बावधन येथील राज्यातील भाविकांचे शक्ती पीठ आणि श्रद्धा स्थान असलेल्या भैरवनाथाची बगाड यात्रा साजरी होणार आहे. त्यास कसल्याही प्रकारचे गालबोट न लागता गावचे कारभारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत अशा सर्वांनी एकत्रित येऊन पार पाडण्यास पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वाईच्या डीवायएसपी शीतल खराडे जानवे यांच्यासह वाई पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी केले आहे.
गेल्यावर्षी बगाड यात्रा कालावधीमध्ये पोलीस प्रशासनाला सहकार्याचा दिलेला शब्द न पाळताच गनिमी काव्याचा वापर करून पोलीस प्रशासनाला अंधारात ठेवून निघालेली बगाड यात्रा कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने गावातील ११० लोकांच्यावर गुन्हे दाखल झाले, ही बाब चांगली नसून पोलिस प्रशासनाचा बगाड यात्रा साजरी होऊ नये असा उद्देश मुळीच नव्हता. त्यावेळी राज्यामध्ये कोरोना रोगाने थैमान घातले होते. यामधून दिवसेंदिवस माणसांच्या मृत्यूची संख्या वाढताना दिसत होती. ही संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील यात्रा आणि जत्रा यांचे कार्यक्रम पूर्ण रद्द केले होते. हे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांनी काढल्यानर त्याची अंमलबजावणी पोलीस प्रशासन करत होते. त्या पाठीमागचा हेतू बावधन गावामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊन माणसे बाधित होऊन त्यांचा मृत्यू होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन स्वच्छ काम करीत होते. पण पोलीस प्रशासनाचे आदेश धुडकावून काढलेल्या बगाड यात्रेचे रूपांतर कोरोना वाढण्यात झाले. त्यामुळे ४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले, याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यात्रेच्या एक महिना आधीच पोलीस प्रशासनाने आजच्या बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती बाळासाहेब भरणे यांनी दिली.
यावेळी गाव कारभारी, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते