बारामती : महान्यूज लाईव्ह
शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीचा शिक्षण सम्राटांऐवजी करिअर अकॅडमीनी अधिक गैरफायदा घेतला असून लाखो रुपयांचे अवाजवी शुल्क पालकांकडून आकारले जात आहे. अकॅडमी शिवाय शिक्षणच पूर्ण होणार नाही अशा प्रकारचा एक भ्रम पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये जाणीवपूर्वक पसरवला जात असून, अशा कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे जागोजागी उगवलेल्या अकॅडमींची चौकशी करावी, अकॅडमीच्या नफेखोरीवर नियंत्रण आणावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने मोहीम आखली आहे.
बारामतीतील ॲकॅडमींकडून घेतल्या जात असलेल्या भरमसाठ शुल्कावरून संभाजी ब्रिगेडने सुरुवात केली होती. त्याला पालकांच्या स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अर्थात फक्त बारामतीच नव्हे, तर राज्यभरातील प्रत्येक निमशहरी व शहरी भागात अशा अकॅडमींचे पेव फुटले आहे. ज्यांना पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकऱ्या मिळत नाहीत, तसेच विनाअनुदानित तत्त्वावरील शाळांमध्ये काम करावे लागते अशांनी या शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अकॅडमी सुरू केल्या आहेत.
आता अशा शेकडो अकॅडमी एका एका शहरांमध्ये पाहायला मिळत असून अकॅडमीच्या गोंडस नावाखाली पालकांकडून भरमसाठ शुल्क आकारले जात आहे. त्याचप्रमाणे या अकॅडमी चालक व अनेक शाळा व महाविद्यालये यांची व्यावसायिक अनैतिक साखळी तयार झाली आहे. संबंधित शाळा व महाविद्यालयाच्या शिक्षक व संस्थाचालकांना कमिशन देऊन तेथील विद्यार्थी नावाला शाळेमध्ये प्रवेश घेतलेले असतात आणि प्रत्यक्षात अकॅडमीमध्ये शिक्षण घेतात अशी सध्या परिस्थिती सर्वत्र दिसते आहे.
शिक्षणाच्या या बेकायदेशीर बाजारीकरणाला शासनाच्या शिक्षण व्यवस्थेतील अधिकाऱ्यांचा देखील अप्रत्यक्ष पाठिंबा असून ही विकृत साखळी तोडण्यासाठी संभाजी ब्रिगेड न्यायालयीन लढा देण्याच्या देखील विचारात आहे. संभाजी ब्रिगेडने यासंदर्भात उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उच्च शिक्षण संचालक तसेच जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देखील या संदर्भात सूचित केले आहे.
दरम्यान बारामतीतील ॲकॅडमी चालकांची ईडी व सीबीआयमार्फत देखील चौकशी करावी अशा प्रकारचे निवेदन याआधीच संभाजी ब्रिगेडने दिले असून त्याचा पाठपुरावा केला जात असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे यांनी महान्यूज लाईव्ह शी बोलताना सांगितले.
शिक्षणाच्या या बाजारीकरणाविरोधात या पुढील काळातही मोहीम अधिक तीव्र करणार असून सीईटी व जेईई याला असलेले महत्त्व जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत अशा अकॅडमी पालकांकडून भरमसाठ शुल्क आकारणार आणि यात पालकांचा खिसा रिकामा होणार यात शंका नसल्याचे संभाजी ब्रिगेड ने म्हटले आहे.
या पुढील काळात शाळा व महाविद्यालयांमध्ये ज्याप्रमाणे इतर विषय असतात, त्याचप्रमाणे सीईटी विषय देखील सक्तीने समाविष्ट करावेत व त्यासंदर्भात नव्याने वटहुकूम काढावा अशी मागणी देखील संभाजी ब्रिगेडने केली आहे. राज्यात कोरोना च्या परिस्थितीमुळे पालकांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे, अशा परिस्थितीत जाहिरातीच्या नावाखाली या ॲकॅडमींकडून चालवला जात असला प्रपोगंडा आणि पालकांकडून विद्यार्थ्यांकडून पालकांवर येणारा दबाव या परिस्थितीत मात करण्यासाठी राज्य शासनाने सामाजिक हिताचा विचार करावा आणि या विकृत पद्धतीला पायबंद घालावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भात येणाऱ्या काळात गावागावात व शहरांमध्ये सामुहिक जनमताची मोहीम आखली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष अमोल काटे यांनी महान्यूज ला सांगितले.