घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाला गुणवंत शिक्षकांचा व्देष वाटतो की काय असे वाटावे अशा घटना एकामागोमाग एक घडताना दिसत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीची आदर्श शाळा उभी करणाऱ्या शिक्षकास नोटीस बजावल्याची घटना यापूर्वीच घडली आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना ‘ तुम्ही तुमच्या शाळेसाठी काय केले ‘ असे विचारून पीएचडीसाठी रजा नाकारण्याचा प्रयत्न होत आहे.
रणजितसिंह डिसले हे सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल टीचर मिळाला आहे. त्यांनी अमेरिकेमध्ये पीएचडी करण्यासाठी दिड महिन्यांपूर्वी शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज पाठवला आहे. त्यावर शाळेचे काय करणार ?, तीन वर्षात शाळेसाठी काय केले ? अर्ज योग्य नमुन्यात भरून आणा असे खास ‘ प्रशासकीय ‘ प्रश्न विचारून त्रास दिला जात आहे.
यासंदर्भात शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी याबाबत विचारले असता सांगितले की, ” रणजित डिसले यांनी गेल्या तीन वर्षात जिल्हा परिषदेचे नाव उंचावण्यासाठी तसेच शाळेसाठी काय केले याचा शोध घेण्यासाठी, त्यांच्या कामाची फाईल सादर करण्यास संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्यास सांगितले आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार डिसले यांना मिळाला ही अभिमानाची गोष्ट आहे, पण त्यांच्या या कर्तृत्वाचा परितेवाडी शाळेला काय उपयोग झाला, ते तपासावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आम्हाला उपयोग हवा आहे. त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी इतकी मोठी रजा देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करणे परवडणार नाही. “
याबाबत रणजितसिंह डिसले यांनी सांगितले की, ” जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ‘ आयटी ‘ विषय शिकवत होतो. शासनाच्या ‘ डाएट ‘ योजनेअंतर्गत दोन वर्षे प्रतिनियुक्तीवर विशेष शिक्षक म्हणून माझी नियुक्ती आहे. शिक्षणातील नवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी अमेरिकेला सहा महिने जाणार आहे. त्यासाठी रजा मिळावी म्हणून अर्ज देऊन दीड महिना झाला तरी त्याला मंजुरी का मिळाली नाही ? हे मला माहित नाही. “
आज तीन वर्षाचा हिशोब मागणारे शिक्षणाधिकारी गेले तीन वर्षे काय करत होते ? हादेखील मोठा प्रश्न आहे. आज फक्त डिसले यांनी आणखी गुणवत्ता मिळवू नये यासाठी काहीही करून त्यांची वाट अडविण्याचा शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रयत्न स्पष्ट दिसतो आहे.
शासकिय यंत्रणेमध्ये वरिष्ठांना आपल्यापेक्षा हुशार लोक आवडत नाहीत, चाकोरीपेक्षा वेगळा विचार करणारे लोकांच्या मार्गात प्रशासनात सतत अडचणी आणल्या जातात, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. आपल्या गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन न देता त्यांचे पाय ओढणारे हे प्रशासकीय अधिकारी विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये शिकण्यासाठी कसे काय शिकवू शकतील हाच मोठा प्रश्न आहे.