शिरूर : महान्यूज लाइव्ह
देव कुठे असतो का? तर हो असतोच..! तो कोणत्या ना कोणत्या रूपात भेटत असतो. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील त्या निष्पाप मुलीला देवदूत भेटला अन् त्या मुलीला हक्काचा मायेचा आधार ही भेटला…परंतु समाजाच्या जाणीवा बोथट झालेल्या असल्याचेही दिसले.. म्हणूनच अशी वेळ अन्य कोणावर ही येऊ नये याचीही जाणीव झाली..!
सविस्तर हकीकत अशी की, शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील अत्यंत गरीब कुटुंबातील एका महिलेवर अतिप्रसंग करताना तिने विरोध केल्याने त्यांची हत्या काही दिवसांपूर्वी झाली होती. या महिलेला एक विशेष मुलगीही आहे. या मुलीला वडीलही नव्हते अन् आईची ही हत्या झाल्याने पोरकेपण आलेले होते.
या घटनेनंतर मुलीची जबाबदारी कोणी स्वीकारायची हाच खरे तर मोठा प्रश्न होता. त्यात मुलगी विशेष असल्याने तिच्या गरजाही विशेष असल्याने तिची काळजी अधिक घेणे गरजेचे होते. घटना घडल्यानंतरही अनेकजण केवळ पाहण्याची भूमिका घेत होते. मात्र कुणीही पुढे येत नव्हते. माञ म्हणतात ना समाजात आजही कोणाच्या तरी रूपात देव धावून येत असतो. यासाठी कवठे येमाई येथील दीपक रत्नपारखी हे देवरुपाने धावून आले.
दीपक रत्नपारखी यांना सदरील मुलीच्या भविष्याची चिंता सतावत होती. यासाठी त्यांनी आईच्या निधनानंतर लागलीच मुलीसाठी योग्य निवारा कोठे मिळतोय का यासाठी शोधाशोध सुरू केली. यावेळी त्यांची ही बाब शिरूर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशनच्या संस्थापिका राणी चोरे यांना सांगितली.
यानंतर सामाजिक संस्थांचा शोध घेतला असता अनेक ठिकाणी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद येथील स्व आधार मतिमंद मुलीचे बालगृह याचा पत्ता मिळाला. मात्र इथेही जाणे, प्रवेश मिळवणे इतके सोपे नव्हते. याठिकाणी आवश्यक कागदपत्र यांची पूर्तता करणे गरजेचे होते.
यावेळीही पुन्हा दीपक रत्नपारखी यांनी पुन्हा धावपळ सुरू केली. मुलीची वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवणे, यांसह सर्व आवश्यक कागदपत्रे ही ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन याकडून मोठ्या महत्प्रयासाने ती मिळवता आली.
यानंतर ही दीपक रत्नपारखी यांनी हार न मानता सर्व कागदपत्रांची पूर्तता करून संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी उस्मानाबाद येथील स्वआधार या प्रकल्पाचे शहाजी चव्हाण, आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशनच्या संस्थापिका राणीताई यांनी मोठा धीर देत सातत्याने संपर्कात राहून अखेर प्रवेश मिळवून दिला.
उस्मानाबाद येथे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अखेर दीपक रत्नपारखी, राणीताई चोरे, वाघोली येथील सामजिक कार्यकर्ते गणेश सातव, पत्रकार सतीश केदारी, दत्तात्रय केदारी, सोपान वागदरे, अक्षय गायकवाड यांनी या मुलीला सुखरूप संस्थेकडे सुपूर्द केले.
यावेळी स्वआधार संस्थेचे संस्थापक शहाजी चव्हाण यांनी देखील सर्व हकीकत ऐकून भारावून जात रत्नपारखी व सहकारी यांचे कौतुक केले. माघारी परतताना सर्वांचे डोळे भरून आले होते.
समाजात आजही अनेक संवेदनशील व्यक्तिमत्व असतात हे दीपक रत्नपारखी, आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन च्या राणीताई चोरे, शहाजी चव्हाण यांच्या रूपात दिसून आले असून समाजाची दुसरी बाजू ही समोर आली असून अशा विशेष मुलांसाठी समोर येण्याची गरज आहे. दीपक रत्नपारखी यांनी सदरील संस्थेस कवठे येमाई ग्रामस्थांच्या २५ हजार रुपये देणगी संस्थाचालक यांच्याकडे सुपूर्द केली.
मनःपूर्वक धन्यवाद.🙏