दौंड : महान्युज लाईव्ह
कुसेगाव (ता.दौंड ) येथील ग्रामपंचायतीने 26 आक्टोबर रोजी झालेल्या ग्रामसभेत विषय पत्रिकेवर विषय न घेता मनमानी पध्दतीने तंटामुक्ती अध्यक्ष बदलणे व वनसमिती बदलणे हे दोन ठराव गोँधळात मंजुर करुन घेतले. हे दोन्ही ठराव रद्द करण्याचे आदेश दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंजिक्य येळे यांनी नुकतेच दिले आहेत.
दरम्यान, ग्रामसभेतील ठराव रद्द करण्याची ही दौंड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. ग्रामसभेत काही राजकीय मंडळी स्वतच्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी मनमानी पध्दतीने पाहिजे तसे ठराव मंजुर करून घेतात. गावपुढाऱ्यांच्या या कारभाराला आता चांगलीच चपराक बसली आहे.
याबाबत माहिती अशी की, कुसेगाव येथे 26 ऑक्टोबर रोजी सरपंच छाया शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष बदलणे व वनसमिती बदलणे हे विषय पत्रकेवर विषय नसताना ही ऎनवेळीच्या विषयांमध्ये घेवून ठराव मंजुर करून घेतले. या ठरावावर आक्षेप घेत ग्रामपंचायत सदस्य दिपक रूपनवर व ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली. ग्रामसभेत असे ठराव ऎनवेळीच्या विषयात घेता येत नाहीत. हे विषय विषयपत्रकेवर घेणे बंधनकारक आहे. तसेच या विषयासंदर्भात ग्रामसभा घेण्यापुर्वी गावात दवंडी देवून ग्रामस्थांना कल्पना देणे गरजेचे आहे.
ग्रामविकास अधिकारी यांना याबाबत कल्पना असतानाही त्यांनी याबाबत हा निर्णय का घेतला नाही. याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य दिपक रूपनवर व ग्रामस्थांनी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्याकडे केली होती.
त्यानुसार येळे यांनी
ग्रामपंचायतीला अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर गटविकास अधिकारी येळे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. ग्रामसभेत विषय पत्रकेवर सदर विषय नमुद करणे आवश्यक होते. मात्र ग्रामपंचायतीने तसे केले नाही. त्यामुळे ग्रामसभेत मंजुर केलेले वनसमिती आणि तंटामुक्ती अध्यक्ष बदलणे हे ठराव रद्द करावेत, वनसमिती नेमताना वन हक्क समिती घटित करण्यासाठी ग्रामसभेच्या विषयपत्रिकेवर स्पष्ट विषयी नमूद करून ग्रामसभेचे आयोजन करावे व तंटा मुक्ती समिती बाबत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग यांच्या निर्णयानुसार आपल्या स्तरावर कारवाई करावी तसेच संदर्भ क्रमांक 2 प्रमाणे विषय नमुद करून ग्रामसभेचे सूचना पत्र का काढले नाही. याबाबत सात दिवसाच्या आत खुलासा सादर करावा असा आदेश गटविकास अधिकारी येळे यांनी ग्रामपंचायतीला दिले आहेत.
दरम्यान, याबाबत ग्रामसेविका सुरेखा सोनवणे यांच्या संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की. गटविकास अधिकारी यांच्या याबाबत आदेशाचे पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झाले नसून मी याबाबत माहिती घेते, असे त्यांनी सांगितले.