मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या 54 दिवसांपासून सुरू असलेल्या संपातून राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेने माघार घेतली आहे. परिवहनमंत्री अनिल परब आणि संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांच्या झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर हा संप गुजर यांनी मागे घेतला. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांचे कोणतेही नुकसान होत नाही, एसटी कर्मचाऱ्यांनो कामावर रुजू व्हावे असे आवाहन अनिल परब यांनी केले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारची सहनशीलता संपलेली आहे, कठोर निर्णय घ्यायला लावू नका असा इशारा दिला आहे.
गुजर यांनी काल रात्री प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना आम्ही संप मागे घेतला असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, विलीनीकरणाचा लढा न्यायालयावर सोपवलेला आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल. राज्यभरातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी 22 डिसेंबरपर्यंत कामावर हजर व्हावे. आतापर्यंत झालेली कारवाई मागे घेण्याची विनंती आम्ही केलेली आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता सहनशीलता संपत आली आहे, टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी आत्तापर्यंत दहा हजार कर्मचारी निलंबित झालेले आहेत, संपामुळे सदावर्ते यांचे कोणतेही नुकसान होत नाही, हे कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावे असे मत व्यक्त केले आहे.
परब म्हणाले, सरकारला कारवाई करण्याची बिलकूल इच्छा नाही. मात्र लोकांना भेटला धरून अत्यावश्यक सेवा वेठीला धरली जात असेल, तर सरकारही हातावर हात ठेवून बसणार नाही. सरकार सर्व पर्यायांचा विचार करत आहे, ते वापरावे लागतील असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.