सातारा : महान्यूज लाईव्ह
माणूस कितीही लांब गेला तरी गावच राजकारण आणि गाव की त्याला सोडत नाही गावाची नाळ त्याला तोडवत नाही.. नाशिक मधील कंपनीत काम करणाऱ्या माण तालुक्यातील थदाळे येथील मायलेकरांचा मात्र गावच्या राजकारणाच्या प्रेमात दुर्दैवाने जीव गेला.
महाराष्ट्रातील कोणतेही गाव घ्या, त्या गावातून कामाच्या निमित्ताने किंवा इतर गोष्टींच्या निमित्ताने बाहेरगावी राहण्यास गेलेल्यांना नेमकी निवडणुकीच्या काळात गावात आवर्जून बोलावले जाते. मतदानाच्या वेळी कसल्याही परिस्थितीत त्यांनी उपस्थित राहिले पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांकडून आकाशपाताळ एक केले जाते.
एका एका मतदानाची जिथे गरज असते, तिथे तर हा प्रकार सर्रास असतो आणि फक्त राजकारणीच नव्हे, तर ज्यांचे मतदान आहे त्यांनाही त्याची भारी हौस असते. या निमित्ताने गावात जाणे होते गावाची नाळ कायम राहते. माण तालुक्यातील थदाळे गावातील रहिवासी व सध्या नाशिक मधील महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी असलेले गजानन सर्जेराव वावरे हे सोसायटीच्या मतदानासाठी सोमवारी सकाळी या मूळगावी आले होते.
ते त्यांची वृद्ध आई हिराबाई सर्जेराव वावरे यांना घेऊन आले होते. प्रक्रिया संपल्यानंतर आज हे मायलेक नाशिककडे निघत असताना शिंगणापूर नातेपुते रस्त्यावरील भवानी घाटात चारशे फूट खोल दरीत त्यांची कार कोसळली. या अपघातामध्ये या दोन्ही मायलेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.