इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सुरेश मिसाळ
इंदापूर तालुक्यामध्ये सध्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ही योजना वंचित घटकातील दीन दुबळे, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांना ख-या अर्थाने आधारवड ठरत आहे.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या वैशाली प्रतापराव पाटील यांनी केले.
जंक्शन येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या शिबिराचे उद्घाटन वैशाली पाटील यांच्या हस्ते झाले.त्यावेळी पाटील बोलत होत्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,पंचायत समितीच्या सदस्य सारिका लोंढे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमोल पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.शुभम निंबाळकर,पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष रेहना मुलाणी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, संजय निराधार योजना समिती अध्यक्ष सागर मिसाळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना वैशाली पाटील यांनी सांगितले की, खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रयत्नातून राष्ट्रीय वयोश्री योजनेचे आयोजन करण्यात आले असून या योजनेअंतर्गत लाभार्थांना वेगवेगळ्या सहाय्यक साधनांचे मोफत वाटप केले जाणार आहे,त्यामुळे जेष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना ही योजना आधारवड ठरत आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये या योजनेच्या जास्तीत-जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी दत्तात्रय भरणे यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या दिल्या असून गावो-गावच्या कार्यकर्त्यांना या विषयी सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे ६० वर्षांवरील सर्व जेष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना खऱ्या अर्थानं या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून त्यांच्या चेह-यावर निश्चितपणे आनंद दिसणार आहे.त्यामुळे प्रत्येक गावातील गरजू ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी मेहनत घेत असून निश्चितपणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.