बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती हे देशातील आदर्श शहर बनविण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजीत पवार करत आहेत. परंतू स्वच्छतेच्या आघाडीवर याला यश मिळताना दिसत नाही. नुकतीच स्वच्छ शहरांची यादी घोषित झाली, त्यामध्ये बारामतीला स्थान मिळू शकलेले नाही.
आता मात्र बारामती स्वच्छ करण्यासाठी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी जोर लावला आहे. ते स्वत: दररोज याबाबत आढावा घेत आहेत. शहरातील कचरा उचलणाऱ्या घंटागाडयांना जीपीएस लावण्यात आलेले आहेत. या जीपीएसव्दारे या घंटागाड्यांच्या कामकाजावर स्वत: मुख्याधिकारी लक्ष ठेऊन आहेत.
शहराच्या स्वच्छतेबाबत ज्यांचे मोठे योगदान होते असे बारामती नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील एका निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा नगरपालिकेच्या सेवेत रुजू करून घेण्यात आलेले आहे. स्वत: उभे राहून काम करुन घेणाऱ्या या अधिकाऱ्यामुळेही स्वच्छता मोहिमेला गती मिळणार आहे.
मात्र नागरिकांनीही याबाबत सहकार्य करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. उघड्यावर कचरा न टाकणे आणि ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देणे हे काम नागरिकांनी केले पाहिजे अशी अपेक्षा मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मात्र घंटागाड्यांची वेळ निश्चित नाही, विलगीकरण करून दिलेला कचरा नगरपालिकेचेच कर्मचारी एकत्र करत असल्याचे अनेकदा दिसते अशा अनेक तक्रारी नागरिकांच्या आहेत. याबाबत नगरपालिका काय करणार यावरच या स्वच्छता मोहिमेचे यश अवलंबून असणार आहे.