इंदापूर : महान्यूज लाईव्ह
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीदरम्यान बैठकीस उपस्थित राहण्यावरून पृथ्वीराज जाचक आणि संचालक मंडळामध्ये खडाजंगी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून आपण येथे असून शेवटच्या क्षणापर्यंत मी सभासदांसाठी लढत राहील असे सांगत पृथ्वीराज जाचक या सभेमध्ये बसून राहिले आणि ही संचालक मंडळाची सभा त्यांच्या उपस्थितीत पार पडली.
या घटनेमुळे पुन्हा एकदा दीड वर्षातच जाचक आणि राष्ट्रवादी यांचे जुळलेले सूर बेसूर स्थितीपर्यंत पोहोचल्याच्या चित्र निर्माण झाले. दरम्यान या घटनेसंदर्भात जाचक यांनी पत्रकार परिषदेत महिती दिली
ते म्हणाले, मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर छत्रपती कारखान्यात लक्ष घालावे आणि संचालक मंडळाच्या बैठकीत थांबावे अशी सूचना दिली होती. अशा स्वरूपाचे लेखी पत्र माझ्याकडे आहे. त्यानुसार मी संचालक मंडळाच्या बैठकांना हजर असतो. मात्र आज दोन संचालकांनी आपल्याला या संचालक मंडळाच्या बैठकीत हजर राहायचे नाही असे सांगितले.
या संदर्भात मी त्यांना उपस्थित राहू नये अशा आशयाचे पत्र देण्यास सांगितले. ते पत्र त्यांना देता आले नाही आणि मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना केली असल्यामुळे ते स्वतः जोपर्यंत सांगत नाहीत, तोपर्यंत मी बैठकांना हजर राहणारच आणि संचालकांच्या चुकीच्या कृत्यांना विरोध करणार.
जर माझी कारखान्यात काहीच उपलब्धी नाही, तर यापूर्वी गाळप हंगामात चार लाख टन गाळप झाले होते ते नऊ लाख टनापर्यंत कसे पोहोचले? त्याचबरोबर याच हंगामात साखरेचा दर्जा कसा वाढला? यापूर्वी देखील हेच संचालक मंडळ सत्तेवर होते, मात्र त्यांना फक्त मी नको आहे, कारण जर मी असेल, तर यांची दुकाने बंद पडतील याची भीती त्यांना आहे.
दीड वर्षापूर्वी जेव्हा आम्ही अजितदादांसोबत आलो तेव्हा देखील आता आहे ते सर्व जिथल्या तिथे सोडून आपण एकत्र यायचे अशा स्वरूपाची चर्चा झाली होती आणि तसा निर्णय झाला होता. त्यानुसार गेली अनेक वर्षे विरोधात राहूनही आम्ही कारखान्याच्या भल्यासाठी एकत्र आलो.
या कारखान्यातील सभासदांचे हित माझ्यासाठी महत्वाचे आहे. त्याचबरोबर या कारखान्याशी माझे भावनिक नाते आहे. मात्र प्रत्येक वेळी हे संचालक मंडळ चुकीचे काहीतरी करते. याचा दीर्घकालीन परिणाम वाईट होऊ शकतो, या भावनेने आम्ही त्याला विरोध केला की, ते चुकीच्या पद्धतीने सांगितले जाते.
वास्तविक पाहता येणार्या हंगामात अजून साखर तयार व्हायची आहे, त्या साखरेचे व्यवहार करण्यासाठी संचालक मंडळ निघालेले आहे.
वस्तुतः ब्राझीलमध्ये सध्या उसाचे उत्पादन खूप कमी झाले आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये साखर कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहे. त्याचा परिणाम जागतिक साखरेच्या बाजारावर होणार असून साखरेचे दर वाढणार आहेत. अशा परिस्थितीत आत्ताच साखर कमी दराने व्यवहार करणे कितपत योग्य आहे? आम्ही याला विरोध केला आहे.
त्याचबरोबर मळीचे देखील दर वाढणार आहेत, मात्र आत्ताच मळीचे विक्री केली जात आहे. त्याला विरोध करून आमचे काही चुकले का आणखी एक गोष्ट म्हणजे गेली अनेक वर्षे ऊस न घालता 14 हजार सभासद केवळ साखर नेतात. मात्र त्यामुळे कारखान्याचे दर वर्षी 15 कोटींचे नुकसान होते. या सभासदांना कमी करणे कारखान्याच्या हिताचे आहे. कायदेशीर दृष्टीने अपात्र असलेल्या सभासदांना शासन निर्णयानुसार पुन्हा कोरोनाचे निमित्त सांगून पात्र ठरवले आहे. त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात गेलो आहोत. आम्ही आमच्या पैशाने ही लढाई लढत असून, संचालक मात्र कारखान्याच्या पैशाने हा लढा लढत आहेत त्याला मी विरोध केला.
सध्या एक एक रुपया वाचण्याची गरज आहे असे असताना केवळ आम्ही या सभासदांना विरोध केला म्हणून संचालक मंडळात काहीजण व्यक्ती द्वेषाने पछाडलेले आहेत याचे वाईट वाटते. आम्ही या सभासदांसंदर्भात उच्च न्यायालयात गेलो आहोत. खरेतर हा सरकारचा निर्णय असला तरीदेखील कारखान्याच्या आर्थिक प्रगतीसाठी नुकसानकारक असल्याने आम्ही फक्त या निर्णयाच्या विरोधात गेलो आहोत.
मात्र संचालक मंडळातील काहींनी परस्पर आम्ही सरकारच्या विरोधात आहोत अशी हूल उठवली.
आपले आर्थिक नुकसान होते म्हणून आपण आयटीआय बंद करतो, तर आर्थिक नुकसान आहे याची माहिती असूनही आपण इतर गोष्टींबाबत सावध का होत नाही हा खरा प्रश्न आहे.