अमरावती : महान्यूज लाईव्ह
विदर्भात अतिवृष्टी व पुरामुळे आधीच शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाले असतांना आता उर्वरित पिके सुद्धा संकटात सापडली आहेत. अमरावती जिल्ह्यातील कारंजा बहिरम परिसरात असणाऱ्या शेतीपिकांवर (शंखांचा) गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
कारंजा बहीरम परिसरातील जवळपास तेराशे हेक्टर पिकांवर आता या शंखांनी हल्ला चढवून बोंड, पाने,फुले खाणे व झाडांची साल खाण्यास सुरूवात केली आहे.
त्यामुळे झाडे वाळत आहेत. याच बरोबर तूर, मिरची, संत्रा झाडांवरही या शंखाने हल्ला केल्याने शेतकर्यांना आता मोठी चिंता सतावत आहे. आफ्रिकन स्नेल असे या गोगलगायींचे नाव असून या शंखाना आपल्या शेतातून कसे काढायचे हा यक्ष प्रश्न आता शेतकऱ्यांना सतावतो आहे.
दिवसातून तीन-तीनदा शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाऊन झाडाला, रोपाला लागलेले शंख स्वतः काढून त्यांचा नायनाट करावा लागतो आहे. आधीच कोरोना काळामुळे शेतकऱ्यांकडे मजूर येत नाहीत. त्यामुळे गवत काढण्यासाठी वेगळा मजूर, कापूस वेचण्यासाठी वेगळा मजूर, त्याचबरोबर इतर कामांसाठी वेगळा मजूर व आता शंखांसाठी वेगळा मजूर लावावा लागत आहे.
शेतात मजुरावर कीटकनाशकांवर सारा खर्च झाला, तर मग स्वत ला काही उरेल की नाही हा प्रश्नही त्याला सतावतो आहे . जवळपास तेराशे हेक्टर जमिनीवरील पिकांवर हा शंखाचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. मात्र शंख हा कीटक नाही म्हणून नैसर्गिक आपत्ती नसल्याचेही मंडल कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे असे येथील शेतकरी सांगतात.