राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या 39 व्या पार पडलेल्या आँनलाईन सर्वसाधारण सभेत मी पुर्णवेळ हात वर करूनही बोलण्याची संधी दिली नसल्याने कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे हे सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार आहेत.
ते म्हणाले, मला या सभेत काही महत्त्वाचे प्रश्न विचारायचे होते त्यामुळे मी संधी मागत होतो. मात्र कारखान्याच्या अध्यक्षांनी मी सहकार आयुक्त, साखर आयुक्त आणि ईडीची चौकशीची मागणी केल्यानेच जाणीवपूर्वक मला बोलण्याची संधी दिली नाही. माझा बोलण्याचा हक्क त्यांनी डावलला आहे. कारखान्याच्या अध्यक्षांच्या या वागणुकीची निषधे करतो आणि त्यांची याबाबत सहकार आयुक्त यांच्याकडे तकार करणार आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार (दि 30 ) कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सभा पार पडली. यासभेनंतर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी संचालक नामदेव ताकवणे यांनी प्रसिध्द पत्रिकेद्वारे गंभीर आरोप केले आहेत.
गुरूवारी पार पडलेल्या ऑनलाइन सभेत मी पुर्णवेळ हातवर वरून मला बोलण्याची संधी मागत होता. परंतु शेवटपर्यंत मला बोलण्याची संधी दिली गेली नाही. कारखान्याच्या हिताचे मत मला या सभेत मांडायचे होते. मात्र अध्यक्षांनी जाणीव पुर्वक मला बोलण्याची संधी न देवून माझा हक्क डावलला आहे.
मराठीत एक म्हण आहे. सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही. त्याच पद्धतीने कारखान्याच्या अध्यक्षांची ही वृत्ती कालच्या सर्वसाधारण सभेतही पहावयास मिळाली. या वृत्तीचा मी निषेध करतो असे ताकवणे म्हणाले.
मागील वीस वर्ष सर्वसाधारण सभा कशा गुंडळायच्या हे कारखान्याच्या विद्यमान अध्यक्ष कडून शिकावे, कालच्या सभेतही त्यांनी त्यांच्या समर्थकांना बोलण्याची संधी दिली. विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक 1 ते 11 हे विषय बहुंताश सभासदांचे हात वर दिसतात असे बोलून मंजुरी करून घेतले.
कोणालाही बोलण्याची संधी दिली नाही. अवघ्या अडीज मिनिटात अकरा विषय मंजुर करून घेतले. कारखान्याच्या अध्यक्षांनी प्रस्ताविक भाषणांमध्य जी भूमिका मांडली, त्या भूमिकेच्या अगदी विरोधात ते या सभेत वागले आहेत. वास्तविक मी 3 सप्टेंबर 2021 रोजी पत्रकार परिषद घेऊन मी कारखान्याच्या चौकशीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मला बोलण्याची संधी देवून अध्यक्ष जाहीरपणे चर्चा करतील अशी अपेक्षा होती, मात्र ते सर्व चर्चेपासून दूर गेले आहेत.
कारखान्याच्या वस्तुस्थिती बाबत त्यांनी सभासदांना अंधारात ठेवले आहे.सभासदांची दिशाभुल आणि दिशाहीन करून ही सभा गुंडाळली आहे असा आरोप ताकवणे यांनी प्रसिध्दीपत्रकात केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष हे कारखाना तांत्रिक कारणामुळे बंद आहे असे सांगतात, मात्र कोणत्या कारणामुळे कारखाना दोन वर्ष बंद आहे हे सांगितले नाही.
कर्ज स्वरूपात 35 कोटी 90 लाख रुपये अनुदान मिळाले आहेत, याचा न पटणारा खुलासा अध्यक्षांनी केला आहे. 32 कोटी साखर शिल्लक आहे, शासकीय अनुदान व्यतिरिक्त 122 कोटी येणे दिसते, अध्यक्षांना कारखाना खरंच चालू करायचा अशी तळमळ असेल तर त्यांनी प्रथम श्वेत पत्रिका तयार करावी, कारखाना बंद पडायला फक्त कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष जबाबदार आहेत असा आरोप नामदेव ताकवणे यांनी कुल यांच्यावर या प्रसिध्द पत्रिकेत केला आहे.
कुल यांनी आरोप फेटाळले
दरम्यान, याबाबत कारखान्याचे अध्यक्ष,आमदार राहुल कुल म्हणाले की, नामदेव ताकवणे आणि मी एकाच पक्षात काम करत आहोत. ते माझे चांगले मित्र आहेत, सहकारी आहेत. त्यांना काल झालेल्या सर्वसाधारण सभेत संधी दिली नाही असा त्यांचा आरोप असला तरी मुळात सर्वसाधारण सभेला 1 हजार सभासद आनलाईन होते.
या सर्वांची बोलण्याची इच्छा असते, मात्र प्रत्येकालाच बोलण्याची संधी देणे शक्य नाही. ताकवणे यांचे काही प्रश्न किंवा शंका असल्यास त्यांनी माझ्याशी केंव्हाही संपर्क साधून चर्चा करावी. त्यांच्या सर्व शंकाचे निरसन केले जाईल. मी केंव्हाही उपलब्ध होईल. पुढील होणा-या सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाला सर्वसाधारण सभा घेण्याची संधी मिळाल्यास त्यांना बोलण्याची संधी दिली जाईल.