नागपूर: महान्यूज लाईव्ह
पैशाच्या वाटणीवरून मित्रांमध्ये वाद झाला.. भंगारात आणलेल्या साहित्याची विल्हेवाट कशी लावायची याच्या वरून सुरू झालेला वाद थेट मित्राला रेल्वेचे लोखंडी रॉड डोक्यात मारेपर्यंत पोचला.. त्यात मित्र जिवानिशी गेला. हा राग तिथे थांबला नाही, मित्राचा मृतदेह पोत्यात भरून सायकल वरून नेला आणि मित्राचे ते प्रेत मित्रानेच पुरून टाकले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील हा खळबळजनक प्रकार केवळ जागरूक नागरिकांच्या प्रसंगावधानी सतर्कतेमुळे उघडकीस आला.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील ज्ञाना रुपराव शेंडे वय 23 वर्षे राहणार रेल्वे झोपडपट्टी असे या घटनेत जिवानिशी गेलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेत पोलिसांनी विजय उर्फ गोलू सखाराम मांडले आणि त्याचा भाऊ सुरजीत सखाराम मांडले या दोघांना अटक केली आहे.
यातील ज्ञाना शेंडे हा लोखंडी साहित्य विक्री करतो. भंगारात किंवा इतर ठिकाणी पडलेले लोखंडी साहित्य आणून त्याची विक्री करत असायचा. तर गोलू आणि सुरक्षित मांडले हे दोघेजण ज्ञानाचे मित्र होते. ते तिघे मिळून या लोखंडी साहित्याची विल्हेवाट लावायचे. रविवारी पाच सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास गोलू आणि सुरजीत हे दोघे जण घरी होते. त्यावेळी ज्ञाना शेंडे हा तेथे आला ्.
यावेळी वाटाघाटीच्या पैशावरून तिघांमध्ये वाद झाला. दोघा भावांनी मिळून ज्ञानाला जीवे मारले. त्यानंतर त्याचा मृतदेह रात्रभर घरात ठेवून, दुसर्या दिवशी सायकल वर नेला आणि पुरला. दरम्यान ज्ञानाचा भाऊ श्याम रुपराव शेंडे याने त्याचा भाऊ हरवल्याची फिर्याद उमरेड पोलिसांकडे दिली होती. मात्र झोपडपट्टीतील नागरिकांना या प्रकरणात वेगळाच वास आला आणि नागरिकांना या घटनेची कल्पना थोडीफार आली.
त्यामुळे या नागरिकांनी पोलिस ठाण्यात जाऊन संशयित गोलू आणि सुरजीत ची माहिती दिली. मात्र पोलिस लक्ष देत नाहीत असे लक्षात येताच नागरिकांनी थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. झोपडपट्टीतील नागरिकांनी नगरसेवक नागेश मानकर, रामसिंग लोंढे, शेखर शिवणकर, नेवा पाल पात्रे, गरीबा मानकर, गणेश पवार, बबन मानकर अशा काही पदाधिकाऱ्यांना घेऊन पोलीस ठाणे गाठले.
चार तासाच्या चर्चेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी त्यांना तपासाचे आश्वासन दिले आणि त्यानंतर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत दोघा भावांना पोलीस ठाण्यात आणले आणि चौकशी केल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. या दोघांनी त्याचा खून केला होता हे निष्पन्न झाले.