नंदूरबार : महान्यूज लाईव्ह
सातपुड्याच्या पर्वतरांगेतील अतिदुर्गम भागातील नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात मृत्यूला ओशाळवणारी घटना घडली. केवळ रस्ता बंद असल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या आपणा सर्वांना शरमेची बाब मानावी लागेल.
नंदुरबार जिल्ह्यातील या तालुक्यातील चांदसैली घाटात पावसामुळे दरड कोसळली. त्यामुळे घाट रस्ता बंद झाला. त्याचवेळी या परिसरातील एका महिलेला घेऊन तिचे नातेवाईक उपचारासाठी निघाले होते. मात्र उपचारासाठी नेले जात असलेल्या या महिलेचा केवळ दवाखान्यात वेळेवर पोहोचू न शकल्याने रस्त्यातच दुर्देवी अंत झाला.
चांदसैली घाटात आज पहाटे दरड कोसळल्याने १०० मीटरपर्यंतचा रस्ता बंद झाला. तेव्हा पायपीट करत हे ज्येष्ठ दांपत्य उपचारासाठी घाटाखालच्या गावात दवाखान्यात निघाले होते. त्यावेळी या ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. तिला चालणेही असह्य झाले. अखेर पतीने खांद्यावर टाकून तिला दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तेव्हा फार उशीर झाला होता. आपल्या पतीच्या खांद्यावर मान टाकलेल्या या महिलेने तशाच स्थितीत या जगाचा निरोप घेतला.
जिल्ह्यातील दुर्गम भागातील तोकड्या आरोग्य व्यवस्थेचा हा बळी म्हणावा लागेल. अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या सोयी सुविधांकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. दरम्यान घटनास्थळी प्रशासन पोहोचले असून रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे व सदर घटनेवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी दिली. दरम्यान आदिवासी विकास मंत्री ऍड. के सी पाडवी यांच्या मतदार संघात अशा घटना घडत असेल तर आदिवासी विकास नक्की कसा साधला जात आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे.