शिरूर : महान्यूज लाईव्ह
आम्ही १०५ आमदार घरी बसवले. त्यामुळेच मोठा जळफळाट होतो आहे. स्वप्नातही टीका केली जाते. चंद्रकांत पाटील हे हरिश्चंद्राचे अवतार असून पवार साहेबांनी पाठीत खंबीर खुपसला असे ते सांगतात, मग पवार साहेबांनी पाठीत खंजीर खुपसला याचे एकतरी उदाहरण दाखवा, राजकारण सोडून देईल असे थेट आव्हान संजय राऊत यांनी यावेळी केले. आम्ही समोरून वार करतो, पाठीत खंजीर खुपसणे हे आमच्या रक्तात नाही असे ते म्हणाले.
शिवसेना हा पक्ष महाआघाडी पक्षातील प्रमुख पक्ष आहे.पक्षातील कार्यकर्त्यांवर जर सुडापोटी कुठे कारवाई होत असेल तर त्यात लक्ष घालावेच लागेल. जिल्ह्याचे नेते पवार साहेब आहेत. स्थानिक शिलेदारांनी संयम दाखवावा, संसार आमच्याबरोबर करायचा आहे. तसेच प्रत्येकाने संयमाने वागावे असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिला.
शिक्रापूर येथे शिरूर व हवेली तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात माहविकास आघाडी सरकार आहे. या सरकारचे निर्माते शरद पवार हे पुणे जिल्ह्याचे आहेत. पुणे जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी खदखद आहे. अनेक ठिकाणी सुडापोटी गुन्हे दाखल होत असल्याचे पहावयास मिळत असून असे प्रकार जर कुठे घडत असतील तर ते आघाडीचे प्रश्न समजून तिथे लक्ष घालण्यात येईल. कार्यकर्त्यांनी तसेच इतरांनी देखील आघाडी धर्म समजून संयमाने वागावे असा सल्ला यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेना कार्यकर्त्यांना बळ दिले जाणार असून प्रत्येक कार्यकर्त्याने ही संघटना मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे असे ते म्हणाले. बैलगाडा शर्यतीवर बोलताना राऊत म्हणाले की, बैलगाडा शर्यत याबाबत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे यापुढे लढ्याचे नेतृत्व करणार असून यासाठी जनआंदोलन उभे करून सरकार व न्यायालय यावर दबाव आणून प्रश्न सोडविण्यास भाग पाडू. बैलगाडा शर्यत सुरू होईपर्यंत उसंत ही घेणार नाही असे ते म्हणाले.
सरकार मध्ये सगळ्याचे एकमेकांशी चांगले आहे. वर काहीच भांडण नाही मात्र स्थानिक पातळीवर वाद असतात. त्यामुळे संयमाने वागा. प्रत्येकाची नोंद घेतली जात आहे. तुम्ही आपापसात लढू नका. शिवसैनिक म्हणून वागा, काम दाखवा, शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या मुळेच आजपर्यंत तरली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे टॉप चे नेते ठरले आहेत.
कार्यकर्त्यांच्या प्रत्येक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या वेळी शिवसेना उपनेते मिलिंद नार्वेकर यांनी शिवसैनिकांना शिरूर हवेलीत संघटना मजबूत करण्यावर भर देण्याचे तसेच यापुढील काळात अधिकाधिक लोकांना जोडण्याचे आवाहन केले.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील बोलताना सांगितले की, निवडणुका या महत्वाच्या नसून संघटना बांधणी महत्वाची असल्याचे सांगत प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिले जाईल. कार्यकर्त्यांनीही आपापसातील मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत असे सांगितले.
बैलगाडा शर्यती साठी गेली २० वर्षे झगडतोय. स्वतः या लढ्यासाठी साठ लाख रुपयांचा खर्च केला आहे. हैद्राबाद सरकारने शर्यतीबाबत आमचा विशेष उल्लेख केला. कोणाच्याने काही होणार नसून आम्हालाच यात लक्ष घालावे लागेल असे सांगितले तसेच राज्य सरकारकडे पीएमआरडीएची चुकीची आरक्षणे याबाबत देखील पाठपुरावा सुरू केला असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके,तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी मनोगते व्यक्त केली.
या प्रसंगी पुणे शहर प्रमुख संजय मोरे, हवेली पंचायत समिती सभापती नारायण आव्हाळे, हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर,युवासेना प्रमुख मच्छिन्द्र सातव, मच्छिंद्र गदादे, संजय देशमुख, अनिल काशीद, पोपट शेलार,शिक्रापूर चे माजी उपरपंच रामभाऊ सासवडे, अनिल वडघुले वीरेंद्र शेलार, विजय लोखंडे, संतोष भोंडवे, आनंद हजारे, रोहिदास शिवले, संजय पवार, अनिल पवार, संतोष काळे, सुनील जाधव, मयूर थोरात, महिला आघाडीच्या श्रद्धा कदम, चेतना ढमढेरे, छाया महाडिक, शैलजा दुर्गे, सुमन वाळुंज, किरण लोखंडे, नंदाताई भुजबळ, निलेश मचाले, समाधान डोके, सोपान जाधव, अमोल हरगुडे,संतोष कोतवाल आदी उपस्थित होते.