वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी १४४ कलम लावून दिले जमावबंदीचे आदेश ..
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
किसनवीर आबांच्या जयंतीदिवशी कवठे येथे आंदोलन करण्याचा राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा डाव आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून जनक्षोभाचाची दखल घेत भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांनी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. दुसरीकडे आंदोलनकर्ते आबांच्या स्मारकाच्या परिसरात दिसल्यास फोडून काढणार असा कवठे ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.
कवठे येथील थोर स्वातंत्र्य सेनानी कै. किसनवीर आबांच्या स्मारक परिसरासह पुणे, सातारा, सातारा – पुणे या महामार्ग परिसरात वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी १४४ कलम लावून जमाव बंदीचा लेखी आदेश काढला आहे.
भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आशिष कांबळे यांच्याकडे सुपूर्त करुन तेथील कायदा सुव्यवस्था आबाधित ठेवण्या साठी पोलिस फौज फाटा तैनात करण्याचे दिलेल्या आदेशात नमुद केले आहे. आबांच्या जयंतीदिनीच त्यांच्या स्मारकास पोलिस छावणीचे स्वरूप आल्याने कवठे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे.
सविस्तर वृत्त असे की, कवठे (ता.वाई) येथील वंदनीय नेते सातारा जिल्ह्याचे शिल्पकार आणि थोर स्वातंत्र्यसेनानी देशभक्त किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर यांची दि. ३० रोजी ११६ वी जयंत्ती आहे. यानिमित्ताने दर वर्षी गोकुळ आष्टमीच्या दिवशी कवठे (ता.वाई) येथील ग्रामस्थ आपल्या या थोर सुपुत्राची जयंत्ती मोठ्या जल्लोषात साजरी करत असतात.
पण दुर्दैवाने या वर्षी या जयंतीच्या दिवशीच सातारा जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने किसनवीर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिले आणि तेथील कामगारांचे पगार न दिल्याचा मुद्दा पुढे करुन आबांच्या जयंतीदिनी कवठे (ता. वाई) या त्यांच्या मुळ गावी असणाऱ्या स्मारकासमोर आंदोलन करणार असल्याचे पत्र भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशीष कांबळे यांना दिले होते.
याची कुणकुण कवठे ग्रामस्थांना लागताच गावात संतापाची लाट उसळली होती. ग्रामस्थांनी एकत्रीत येऊन जयंती दिवशीच येथे होणाऱ्या आंदोलनाला विरोध असल्याचे सह्यांचे निवेदन कवठे ग्रामस्थांनी तयार करुन ते भुईंज पोलिस स्टेशनला दिले आहे. या निवेदनाची गंभीर दखल सहाय्यक निरीक्षक आशीष कांबळे यांनी घेऊन वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
कवठे गावातील या परवानगी नसलेल्या
आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऊपस्थितीत होऊ नये यासाठी वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांना याची सविस्तर माहिती दिली. तहसीलदार यांनी गांभीर्य ओळखून कवठे गावची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी १४४ कलम लागू केले.
सहायक निरीक्षक आशिष कांबळे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्मारक परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त लावल्याने आबांच्या स्मारकाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये म्हणून भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आशिष कांबळे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे .