महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
भारतीय कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांना आज ११७ व्या जन्मदिनानिमित्त गुगलने मानवंदना दिली. गुगलने आज सुभद्राकुमारी यांचे डुडल करून ही मानवंदना दिली. खूब लढी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी या कवितेने सुभद्राकुमारी या स्वातंत्र्यलढ्यात चर्चेत आल्या होत्या. आज गुगल साठी डूडल करण्यासाठी न्यूझिलंड स्थित पाहुण्या कलाकार प्रभा माल्या यांनी हे डूडल बनवले.
गुगलने डुडल केल्यानंतर सुभद्राकुमारी चौहान आज चर्चेत आल्या. सुभद्राकुमारी यांचा जन्म प्रयागराज येथील निहालपूर येथे १६ ऑगस्ट १९०४ रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू १५ फेब्रुवारी १९४८ रोजी झाला. ४४ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या सुभद्राकुमारी चौहान यांची झांसी की रानी ही कविता फार गाजली. तिने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्फुलिंग चेतवले.
फक्त वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहीली होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेले योगदान त्यामुळेच जास्त प्रखर राहीले. १९२३ व १९४२ या दोन वर्षात त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी तुरुंगवास भोगला. आंदोलनांमध्ये सहभागी झाल्यावरून हा तुरुंगवास त्यांना भोगावा लागला होता. अगदी त्या रस्त्याने टांग्यातून जात असतानाही कविता लिहायच्या. खांडवा भारातील ठाकूर लक्ष्मणसिंह चौहान यांच्याशी विवाहबध्द झाल्यानंतर त्यांनी महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात भाग घेतला होता.
आज गुगलने डुडल बनवताना सुभद्राकुमारी यांना मार्गदर्शक लेखिका व स्वातंत्र्यसेनानी अशी ओळख दिली आणि पुरूषांच्या प्रभावाखालील साहित्याच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उंची निर्माण केली असे गुगलने म्हटले आहे. सुभद्राकुमारी यांनी मुकूल, त्रिधारा या नावाने कवितासंग्रह केले होते. तर बिखरे मोती, उन्मादिनी व सीधे साधे चित्र या कथासंग्रहाचे लेखन केले होते.