जुन्नर : महान्यूज लाईव्ह
काही दिवसांपूर्वीच वाईच्या वनविभागाने रानडुकराची शिकार करणाऱ्या बारा जणांना गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यावरून महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली होती. रानडुक्कर व पाळीव डुकरे ही शेतकऱ्यांचे शेतीचे प्रचंड नुकसान करतात. त्यांना मात्र काहीच अटकाव केला जात नाही. यावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना होती आणि आता त्यात जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची भर पडली आहे.
जुन्नर तालुका शेतकरी संघटनेने यासंदर्भात नारायणगावच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना थेट पत्र दिले आहे की, जे पत्र पाहिल्यानंतर पोलिसांनाही काही काळ विचार करावा लागला. शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुकाध्यक्ष संजय भुजबळ, योगेश तोडकर व उपाध्यक्ष अजित वाघ आदींनी सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना हे पत्र दिले आहे.
यामध्ये नारायणगाव हद्दीतील पाळीव आणि फिरत्या डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. नारायणगाव परिसरातील यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, टोमॅटो, मका आणि इतर भाजीपाला पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान या डूकरांनी केले आहे. अशी तक्रार शेतकरी संघटनेने दिली आहे.
शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान डुकरांनी केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नारायणगावातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी पोलिसांनी करावी व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा आणि जे डुक्कर पालन करत आहेत त्या व्यावसायिकांवर योग्य ती कारवाई करावी असे पत्र शेतकरी संघटनेने दिला आहे. त्यामुळे एकंदरीतच यापुढील काळात शेतकरी विरुद्ध जंगली व पाळीव प्राणी असा एक संघर्ष पहायला मिळणार यात शंका नाही.