मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यातील पूरग्रस्तांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी तसेच अनेक दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने आज 11,500 कोटी रुपयांच्या दुरुस्ती व दीर्घकालीन उपायांसाठी आणि तातडीच्या मदतीसाठी मान्यता दिली.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले. यामध्ये अतिधोकादायक भागातील कुटुंबांचे पुनर्वसन, पुरात नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीची मदत, तसेच रस्ते दुरुस्ती आणि अनेक दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याकरता या निधीची तरतूद करण्यात आली आहे.