दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील जोर येथे झालेल्या भुस्खलनाने रिंगरोडचे सुमारे १८ पुल वाहुन गेले असून या गावांशी संपर्क तुटला. कुटुंबे अडचणीत आली. मात्र त्यांच्या मदतीला प्रशासन धावून आले अडचणीतून मार्ग काढत त्यांना शासनाच्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले.
प्रांताधिकारी संगिता राजापुरकर- चौगुले, तहसिलदार रणजित भोसले, नायब तहसिलदार गीतांजली गरड , मंडलाधिकारी, तलाठी ग्रामसेवक यांनी स्वतः बलकवडी धरणातून बोटीच्या सहाय्याने जावून जोर, गावातील खालची व वरची वस्ती, जाधव वस्ती, भातुसे वस्ती येथे शासनाच्या वतीने धान्याचे वाटप केले.
यात गहू, तुरडाळ, तांदूळ, पिठ आदिचा समावेश आहे. भुस्खलनाने जोर खोर्याशी असलेला संपर्कच तुटल्याने येथील ग्रामस्थाचे हाल होत होते. कोणत्याही यंत्रणेची मदत त्या दुर्गम भागात पोचत नव्हती. त्यांना असणारी तातडीची गरज व तेथील परस्थितीची माहिती स्वत:प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर यांनी जागेवर जावून शासनाच्या वतीने मदत तिथे पोचवली.
बलकवडी धरणातून एनडीआरएफच्या बोटींच्या सहाय्याने सदर मदत घेऊन महसुल अधिकारी जोर गावामध्ये पोहचले. तेथून वस्त्यांवर जाऊन शासनाच्या मदतीचे वाटप ग्रामस्थांना केले. या मदतीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.