बारामती : महान्यूज लाईव्ह
आसाम आणि मिझोराम या राज्यांच्या सीमा रेषेवर सोमवारी झालेल्या गोळीबारात पाच पोलिस शहीद झाले असून मराठी आयपीएस अधिकारी व इंदापूर बारामती चे सुपुत्र वैभव चंद्रकांत निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले होते. त्यांना तातडीने एअर अॅंम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून यासंदर्भात त्यांच्या बहिण आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांनी वैभव यांच्याबद्दल पार्थना करणाऱ्या देशभऱातील सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
आसामच्या बराक खोऱ्यातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी यांची मिझोरामच्या ऐझॉल, कोलासिब आणि मामित या तीन जिल्ह्य़ांना लागून १६४ किलोमीटरची सीमा आहे. त्याबाबत दोन्ही राज्यांमध्ये असलेल्या वादातून हा गोळीबार झाला. दोन्ही राज्यातील वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराम मधील कोलासिब पोलीस चौकीचा ताबा घेतल्यामुळे हिंसाचाराला तोंड फुटले होते.
त्यामुळे सोमवारी तुफान गोळीबार झाला. या गोळीबारात आसामचे पाच पोलिस शहीद झाले. त्यामध्ये मराठी आयपीएस अधिकारी वैभव चंद्रकांत निंबाळकर यांच्या देखील पायाला गोळी लागून ते जखमी झाले आहेत. वैभव निंबाळकर हे इंदापूर तालुक्यातील सणसरचे सुपुत्र असून ते बारामतीचे देखील सुपुत्र आहेत. चंद्रकांत निंबाळकर यांचे ते सुपुत्र आहेत. ते सध्या आसाम मध्ये पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
आज यासंदर्भात उर्मिला यांनी भावनिक पोस्ट लिहून सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या पोस्टमध्ये उर्मिला यांनी लिहीले आहे की, सगळं उत्तम चालू असताना सकारात्मक राहणं, प्रार्थना म्हणणं वेगळं आणि ‘वैभवला गोळी लागलीय’ हे वाक्य ऐकायला मिळाल्यानंतर, ‘सगळं नीट होणार’ हा विचार मनात येणं वेगळं! काय झालं, कुठुन झालं, कोणत्या मशिन गननं झालं सगळं दिड दिवसांत एवढ्यावेळा कानावर आलंय पण खरं सांगु, मला आणि माझ्या घरच्यांना फक्त तो सुखरुप असावा, एवढीच आशा लागून राहिली होती.
त्यात माझे प्रेग्नन्सीचे ९ महिने पु्र्ण झाल्यामुळे आता कधीही हॅास्पीटल गाठावं लागणार असल्यामुळे, मला ही बातमी सगळ्यात शेवटी सांगण्यात आली. बाळांनाही आपण पॅनिक झालेलो कळतो आणि तेही मग पॅनिक होतात.
सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली. संपुर्ण विश्वासाने आम्ही भरपुर प्रार्थना म्हणालो. यशस्वी शस्त्रक्रिया पार पडून वैभव आता अगदी सुखरुप आहे. किती आणि कुणाकुणाची कृतज्ञता व्यक्त करु?
माझा भाऊ @vaibhavn_ips ला आसाम-मिझोराम सिमेवर गोळी लागल्यानंतर, त्याची सुखरुप सर्जरी होऊन त्याला आराम लाभेपर्यंत पाऊलो पाऊली सद्गुरु रुपात अनेक माणसे मदतीसाठी धावली! एअर फोर्सच्या स्पेशल एअर ॲम्ब्युलन्सने त्याला मुंबईला आणण्यापासून ते आसाम पोलिस, आसाम सरकार, मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकार, कोकिलाबेन अंबानी हॅास्पिटलचा संपुर्ण स्टाफ, डॅाक्टरांची फौज, @vaibhavn_ips चे सगळे अधिकारी-मित्र-बॅचमेटस्, वरिष्ठ अधिकारी, नामधारक, त्याच्या तब्ब्येतीसाठी प्रार्थना म्हणणारे तुम्ही सर्वजण अशा या संपुर्ण प्रक्रियेत माहित असलेले आणि नसलेले कित्तीतरी मदतीचे हात धावून आले. म्हणूनच मी आणि माझं संपुर्ण कुटुंब तुमचे आयुष्यभराचे ऋुणी आहोत अशी कृतज्ञता उर्मिलाने व्यक्त केली आहे.
दरम्यान वैभव यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती मिळाल्यानंतर इंदापूर व बारामतीतील नातेवाईक व मित्रांनीही समाधान व्यक्त केले.