सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
केंद्र सरकारच्या महत्वकांशी मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन च्या सर्वेक्षणाचे काम सुरू असतानाच याला विरोधाला देखील सुरुवात झाली आहे. यामध्ये सुरुवातीला राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी उडी घेत या प्रकल्पाला विरोध केला आहे. आता त्यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला कारण ठरले आहे, जमिनीच्या मोबदल्यासह शेतकऱ्यांच्या संभाव्य फसवणुकीचे!
जाचक यांनी आज या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस देऊन भूमिका मांडली आहे. यामध्ये जाचक यांनी म्हटले आहे की, या ट्रेनच्या सर्व्हेचे काम सुरू असले, तरी तहसीलदार, प्रांताधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांचा यासाठी कोणताही आदेश नाही. या बुलेट ट्रेनमुळे पालखी महामार्गाप्रमाणे केंद्र शासनाकडून करोडो रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे, असे भासवले जात आहे, ते पूर्णतः चुकीचे आहे.
इंदापूर तालुक्यातील बागायती क्षेत्राची शासकीय किंमत ही प्रतीएकरी आठ ते दहा लाख रुपये इतकीच आहे. रेडी रेकनरचे दर त्याहून कमी आहेत. त्यामुळे आज जमिनीचे प्रत्यक्षात जे बाजारभाव आहेत, त्यापेक्षा अधिक मिळण्याची सुतराम शक्यता नाही असे जाचक यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय या प्रस्तावित रेल्वेमुळे या भागातील कालवे बागायती क्षेत्र व शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. प्रत्येक क्षेत्राचे गावाचे रस्त्याचे दोन दोन भाग पडतील.
या रेल्वे रुळाच्या दोन्ही कडेला भिंतीचे कुंपण असणार आहे. त्यामुळे जवळच्या शेतात जाण्यासाठी पाच ते दहा किलोमीटर अंतरावरून जावे लागेल आणि पिढ्यानपिढ्या कसत असलेली जमीन व घरे जमीनदोस्त होणार आहेत. देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून जमीन मात्र तेवढीच राहिली आहे. त्यामुळे भविष्यात पैसे असले तरी जमीन परत मिळेल अशी शक्यता नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी.
या रेल्वे प्रकल्पामुळे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र सुद्धा विभागली जाणार असून त्यामुळे ऊस शेतीवर व शंभर वर्षापूर्वी मिळाल्या पाणी वाटपावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. या प्रकल्पाबाबत कोणत्याही भूलथापांना अथवा आमिषाला बळी पडू नये अशी शेतकरी कृती समितीच्या वतीने त्यांनी विनंती केली आहे.
दरम्यान यासंदर्भात जाचक यांनी काही प्रश्न उपस्थित केले असून याचे सर्वेक्षण पुणे-सोलापूर महामार्ग लगत यापूर्वी झाले होते, मग परत बागायती क्षेत्रातून सर्वेक्षण करण्याचा अट्टाहास का करण्यात आला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर देशाचा, राज्याचा विकास करत असताना पिढ्यानपिढ्या शेती करणारे शेतकरी उद्ध्वस्त करणारा विकास निश्चितच शेतीवर दूरगामी परिणाम करणारा ठरेल याची नोंद घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
या नियोजित सर्वेक्षणाबाबत सर्वच पक्षांच्या नेते मंडळींना आपण स्वतः भेटून कल्पना दिली आहे व या प्रकल्पाला त्वरित थांबवण्याची विनंती केली आहे. या प्रकल्पास पक्षीय गट विसरून सर्वांनी एकत्र विरोध करणे पुढील पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असे त्यांनी आवाहन केले आहे.











