दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये
गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेला रिमझिम पाउस आणि वेगवान वाऱ्यामुळे कोंढावळे येथील कातकरी वस्तीत एका छपराच्या घरात राहणारे वामन जाधव (वय ६५) यांच्या अंगावर गाढ झोपेत असतानाच मध्यरात्री छप्पर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही माहिती वासोळे गावचे सामाजिक कार्यकर्ते
बाजीराव नवघणे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली. बाजीराव नवघणे यांनी सांगितले की, वाई तालुक्यातील पश्चिम भागात कोंढावळे गावाच्या हद्दीतील पुर्व दिशेला असणाऱ्या सुतारकी नावाच्या शिवारात ओढ्याच्या कडेला गेल्या कित्येक वर्षांपासून पाच ते सहा कुटुंबे गवती छपरे घालून राहत आहेत. या पैकी एका छपरात वामन जाधव वय ६५ हे वयोवृद्ध गृहस्थ एकटेच राहत होते.
त्यांची मुले सुना शेजारच्या छपरात राहत होती. गेल्या दोन दिवसा पासून पश्चिम भागात रिमझिम पावसाबरोबर वेगवान वारेही सुरु आहे. या वेगवान वाऱ्याने येथील एका छप्पर कोसळले. गाढ झोपेत असतानाच वामन जाधव यांच्या अंगावर दि. २१ च्या मध्यरात्रीच्या वेळी हे छप्पर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी वडील झोपलेले छप्पर जमीनदोस्त झाल्याचे पाहुन वडिलांचा शोध मुलगा आणी
सुनेने सुरू केला असता, ते सापडत नसल्याने
त्यांनी जमीनदोस्त झालेले छप्पर ऊचकटण्यास
सुरुवात केले, त्यामध्ये वामन जाधव हे मृतावस्थेत आढळून आले. वाई तालुक्यात पावसासह
वाऱ्याने पहिला बळी घेतला आहे. प्रशासनाने मृत वामन जाधव यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी आणि पश्चिम भागातील कातकरी समाजातील लोकांचे सर्वेक्षण करुन
त्याना शासकीय जागा उपलब्ध करुन घरकुल
बांधून द्यावीत अशी मागणी बाजीराव नवघणे यांनी केली आहे.