मुंबई : महान्यूज लाईव्ह
घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याने 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना चेंबूर येथील वाशीनाका परिसरात घडली आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याचा आढावा घेण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. ‘भारत नगर बी ए आर सी’ ही संरक्षक भिंत कोसळली आहे.
मुंबईत मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे ही भिंत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबईसह उपनगरात काल रात्री पासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे चेंबूर येथील वाशीनाका परिसरात असणारी भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत झोपड्यावर पडली आहे. याच झोपड्यावर झाडेही कोसळली आहेत.
यात आतापर्यंत 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरफचे पथकही दाखल झाले आहे. मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवान ही बचावकार्य करत आहेत. मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून या घटनेची माहिती ते घेत आहेत, मात्र ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अजूनही 5-6 लोक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्या वारसांना राज्य सरकारकडून 5 लाखांची तर केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यात जखमीं झालेल्या नागरिकांना मोफत उपचार करण्यात येणार आहे.