नानाची टांग…
बाबु आज सकाळी नेहमीसारखंच उठला. नेहमीसारखेच दात घासले.. नेहमीप्रमाणेच चहा पिऊन रानात गेला.. मका पेरायची म्हणून काल ट्रॅक्टर कल्टीव्हेटर मारायला आला होता… दोन मुरडान घातलेले बघितले.. दारुळ्या आला नसल्यानं उसाचं तुकडं भिजलंय का बघितलं.. दगूड टाकला.. डुबूक वाजलं.. तसं बाबुला कळलं की,उसाच्या लागणीचं तुकडं रातच्याला भिजलंय.. मग त्यानं दारं बदललं..पाणी दुसऱ्या तुकड्यावर वळवलं.. थोडं इकडं तिकडं बघितलं.. दोन चार तणाचे ठोंब मोडले.. मग बाबु घरी आला..!
बाबु तसा कोणाच्या अध्यात ना मध्यात होता.. म्हणजे तो काहीच करीत नाही म्हणून घरचे वैतागत होते.. आणि तो काहीच कामाचा नाही म्हणून बाहेरचे टोलवत होते.. बाबुचा आला दिवस सारखाच असायचा… बाबुच्या या दररोजच्या निरस जगण्याने बायको रखमा मात्र पार कटाळून गेली.. पार वैतागली.. आपल्या आयुष्यात काही राम नाही असं वाटून तिनं सगळा राग बाबुवर काढला.. बाबु तसा स्वभावाने पण आणि मनाने पण फारच गरीब माणूस..! बाकी इतर ठिकाणी तरी तोंडातून दोन वाक्ये काढायचा.. बायकोसमोर तर त्याचं काही चालायचंच नाही..
पण हा… बाबु विचार फार करायचा… म्हणजे त्याने शेखचिल्लीचा धडा वाचला होता.. एका अंड्यापासून कोंबडी, त्या कोंबडीपासून अनेक कोंबड्या.. अनेक कोंबड्यांपासून अनेक अंडी… ती विकून गर्भश्रीमंत व्हायचे स्वप्नांचे इमले जसे शेखचिल्लीने पाहिले, तसेच इमले बाबु बांधत बसायचा… म्हणजे शाळांची फी भरायची वेळ आली की, बाबुला वाटायचं…आपल्याला लॉटरी लागेल..मग पैसे मिळतील, मग त्या पैशातून थेट शाळाच सुरू करू… बाजारात गेला आणि तिथे त्याने एखादी न परवडण्याजोगी वस्तू पाहिली की, त्याच्या डोक्यात स्वप्नांची इमारत आलीच म्हणून समजा.. मग बाबु त्या काही काळापुरता उद्योजक व्हायचा..
तर असा हा बाबु… बाबुच्या शेतात काही फारसे घडत नव्हते.. वर्षानुवर्षे तोच ऊस, तीच कोथिंबीर, बांधाच्या कडेला, सरीवर लावलेली… तीच काकडी, तेच कलींगड, जे लावलं की, त्याचे पैसेच मिळायचे नाहीत…! इतर शेतकऱ्यांसारखाच बाबु तसा दररोजच्या जगण्याला कंटाळला होता.. काहीतरी नवं घडावं असं त्याला वाटायचं.. पण बाबु ना टेकाडावर राहत होता.. ना नदीच्या कडेला.. की, एखादा पूर येऊन किंवा टेकाड कोसळून त्याच्या आयुष्यात काही बदल झाला असता.. बाबु राहायचाच अशा ठिकाणी की, तिथे काही घडेल असं स्वप्नातही वाटत नव्हतं…
हा.. पण बाबुला स्वप्न फार फार चांगली पडायची.. आता अलीकडेच त्याला असं स्वप्न पडू लागलं की, त्याला १२ कोटी मिळालेत… मग कधी त्याला ते लॉटरीतून मिळाले असं वाटायचे, तर कधी जमीन विकून १२ कोटी मिळालेत असं वाटायचे… आता इन मिन तीन दोन एकरात, ज्याला ४० लाखापेक्षा अधिक पैसे कोणी देणार नाही, तिथे १२ कोटी कसे मिळणार? हा प्रश्न त्यामागे असायचाच.. पण एवढं चांगलं स्वप्न संपू नये असं वाटून तो एखाद्या ठिकाणी बसला की, त्याच विचारात गुंगून जायचा.. ते १२ कोटी घेऊन शहरात बंगला बांधायचा.. मग निवांत राहायचं.. दररोज सकाळी सकाळी चहाबरोबर गुडडे ची बिस्कीटं.. स्वयंपाकाला बाई.. धुणंभांडी करायला कामवाली बाई.. सारं कसं एकदम निवांत.. आपण फक्त गाडी चालवत पोरांना शाळेत सोडायला जायचं… बाकी एकदम निवांत..
पाऊस आलाय, म्हणून भिजायला नको.. थंडी वाजतेय म्हणून कुडकुडायला नको.. शहरात किती छान वातावरण असतं.. तसंच जगायचं…! अगदी काही वेळच… कारण नंतर थोड्या वेळानं बाबु भानावर यायचा.. ते स्वप्नच असल्यानं, आता घरी गेल्यावर रखमाचं बोलणं ऐकायला लागणार म्हणून अगोदरच मन खट्टू व्हायचं..
परवा मात्र आक्रीतच घडलं… कधी नव्हं ते घराच्या समोर चार पाच इनशर्टवाली पोरं येऊन थांबली.. हाक मारली.. बाबु पडेल चेहऱ्याने बाहेर आला.. पोरांनी नाव गाव विचारलं.. खात्री केली.. माणूस हाच आहे हे बरोबर ताडलं.. आधार कार्ड मागितलं.. बाबुनं ह्यो काहीतरी लफडा असंल म्हणून आधारकार्ड देणार नाही म्हणून सांगितलं.. काहीतरी फशिवत्याल म्हणाला.. त्या पोरांनी विश्वास दिला.. स्वतःची ओळखपत्रे सांगितली..आणि त्यांनी नंतर जे सांगितलं, ते ऐकून बाबुला एकदम हर्षवायूच झाला..!
बाबुच्या रानातून रेल्वे जाणार होती.. जिथं कधी रानडुकार सुदीक तोंड खुपसायला आली नाहीत.. तिथं थेट रेल्वे घुसणार… पण बाबुला हर्षवायू का झाला?… तर ही रेल्वे घुसणार असली तरी बाबुला मालामाल करणार होती.. बाबुला चक्क १२ कोटी मिळणार होते… म्हणजे गेली काही दिवस जे आपण चिंतत होतो, ते अगदीच खोटं नव्हतं… बाबु मनाशी म्हणाला.. मन चिंती, जे वैरी न चिंती.. पुन्हा बाबुच्या लक्षात आलं.. चांगल्या योगाच्या वेळी आता वैऱ्याचं काय घेऊन बसायचं.. जाऊ द्या.. म्हणत बाबुनं पोरांना सगळी माहिती दिली.. वस्तीवरची सगळीच खुशीत होती.. नाही म्हणायला सगळीच शेतीला कंटाळली होती.. फक्त शेतीचा तुकडा म्हणजे आज्या पंज्यांच्या काळजाचा तुकडा.. त्यो कधी विकायचा नाही.. हे पक्के त्यांना माहिती होतं.. पण दरवर्षीच्या आतबट्ट्याच्या शेतीनं त्यांना पार जाम करून टाकलं होतं..!
आता सरकारच जमीन घेणार म्हटल्यावर आज्यापंज्यांच्या आत्म्याला तळतळाट लागायचा प्रश्नच नव्हता.. शिवाय आयतीच ब्याद जातीय, म्हणून बाबुही एकदम खुश झाला होता.. रखमीच्या तर आनंदाला पारावारच उरला नाही..जेव्हा गावातल्या चार बुकं जास्त शिकलेल्या रामभाऊनं त्यांना गुंठ्याला १५ लाख मिेळणार म्हणून सांगितल्यानंतर गणित ऐकून तिला तर काय करू आणि काय नको असं वाटू लागलं…!
……………
एके दिवशी काय झालं.. बाबु गावात गेला.. बॅंकेत गेला.. मॅनेजरनं त्याला १२ कोटी जमा झाल्याची वार्ता दिली.. बाबुनं पासबुक प्रिंट आऊट करून घेतलं.. १२ कोटी जसेच्या तसे होते.. बराच वेळ शून्य तपासून बघितले.. पुन्हा पुन्हा बघितले… बाबु एकदम खुश…त्यानं लागलेच दोन फोन घेतले.. एक रखमाला.. एक त्याला.. रखमा घरच्या साऱ्यांशी फोनवर बोलू लागली.. बाबु रातच्याला वेबसिरीज बघु लागला..दररोज गावात जाऊ लागला.. मिसळपाव खाऊ लागला.. मित्रही गोळा व्हायला लागले.. त्यांनाही खूष करू लागला..
बाबुने मग शहरात दोन गुंठे जागा घेतली.. बांधकामाचं कंत्राट मित्राच्या पोराला दिलं.. पण आतासुद्धा रखमा नीट बोलत नव्हती.. पोरं तर पार बिघडली होती.. पण बाबुला त्याची फिकीर नव्हती.. त्याचं जरा बरं चाललं होतं.. नेहमीप्रमाणे मित्र वाढले होते.. एके दिवशी रेल्वेचे अधिकारी घरी येऊन थांबलेले त्याला नव्याकोऱ्या फोनवर निरोप मिळाला.. बाबुने नव्याकोऱ्या गाडीला किक मारून घर गाठलं..
साहेबांनी सांगितलं.. रेल्वेत नोकरी करणार का?…आता तर बाबुच्या आनंदाला पारावारच उरला नाही. बाबु दुसऱ्याच दिवशी रेल्वेच्या हाफिसात गेला.. बाबुने सही केली.. बाबु या वयात नोकरीला लागला. तो झेंडा धरायला होता.. त्याला काम सांगितलं.. दोन दिवसांनी बाबु कामावर गेला..चार दिवस झालं.. अचानक एका दिवशी बाबु स्वप्नात गढला.. झेंडा धरायला विसरला.. आणि रेल्वे थेट बाबुचं, ज्याच्याशी जमत नाही.. त्या भैय्याच्या घरावरच आदळली… त्या दिवशीची ती ब्रेकींग न्यूज होती.. गावात राजकारण झालं.. बाबुला रेल्वे नेमकी त्या भैय्याच्या घरावर नेऊन आदळायची होती, असाही आरोप झाला.. पोलिस घरी आले.. बाबुला ओढत नेलं.. बाबुला लॉकअपमध्ये टाकलं.. बाबुचे हात बांधून पोलिस त्याला दहशतवाद्याला पिक्चरमध्ये मारतात तसं मारू लागले… बाबु विव्हळत होता.. नाय हो… मी कशाला तसं करू.. असे म्हणत विनवणी करीत होता..तसं एका साहेबानं येऊन पेकाटात लाथ मारली.. बाबु चार फूट खाली फेकला गेला.. अगं आय्योव… म्हणत ओरडू लागला…
……….
त्याला दोन पोलिसांनी उचललं..तसं एकदम टक्कदिशी बाबु जागा झाला.. लॉकअप नव्हता.. बंगला नव्हता.. रेल्वे नव्हती.. बाबुच्या समोर रखमा आणि दोन पोरं होती.. त्याच्याकडं बघत होती.. त्यांना आश्चर्यानं बघत असल्याचं पाहून बाबुनं इकडं तिकडं बघितलं… रेल्वे अजून तर आलीच नाही.. तोवर एवढं घडलं.. रेल्वे आल्यावर काय घडंल? या विचाराने त्याची पुन्हा पहाटेपासूनची झोपच उडाली..!











