दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : कोरोना आजाराची लाट संपल्यानंतर दि वाई अर्बन बँकेचा शताब्दी महोत्सव विविध उपक्रमांनी आयोजित केला जाईल, असे आश्वासन बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत काळे यांनी केले.
बँकेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने वाई अर्बन बँकेच्या परिवारातील प्रमुख मान्यवरांची विचारमंथन बैठक नुकतीच लोकमान्य टिळक ग्रंथसंग्रहालयात पार पडली. यावेळी चंद्रकांत काळे बोलत होते. तत्पूर्वी बँकेच्या प्रधान कार्यालयात श्री लक्ष्मी प्रतिमा पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. बँकेचे सर्व संचालक, माजी अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेचा शताब्दी महोत्सव कशा पध्दतीने साजरा करायचा, याबाबत यावेळी उपस्थितांनी आपली मते मांडली. चंद्रकांत काळे म्हणाले, मी सुरूवातीस लेखापरिक्षणाच्या निमित्ताने 1982 सालापासून या बँकेशी जोडलो गेलो. तदनंतर संचालक मंडळात काम केले. त्यामुळे बँकेतील सर्व व्यवहारांची मला व संचालक मंडळाला माहिती आहे. 2011 पूर्वी बँक लहान होती. संचालक मंडळाच्या कल्पकतेतून बँकेची चांगली प्रगती झाली आहे. गेली 5-6 वर्षे नोटबंदी, जीएसटी व कोरोना या कारणांमुळे बँकिंग व्यवसाय अडचणीतून जात आहे.
रिझर्व्ह बँकेच्या कडक धोरणांमुळे सहकारी बँक चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापूर्वी दरवेळी आपण एनपीए पाच टक्केच्या आत राखलेला आहे. बँकेच्या व्यवसायात वाढ झाली असली तरी गेले दीड वर्षे सर्व व्यवसाय बंद असल्याने बँकेच्या व्यवसायावरही परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे बँकेच्या एनपीएमध्ये वाढ झालेली आहे. कोरोनाचे सावट कमी झाल्यावर एनपीएमध्ये निश्चितपणाने कमी होईल, अशी खात्री आहे.
भारतातील 1523 सहकारी बँकांमधून आर्थिक स्थितीच्या बाबतीत आपल्या बँकेचा 82 वा क्रमांक लागतो आहे. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेने धोरणे ठरविताना आपल्या बँकेकडूनही सल्ला मागवला आहे. तो एक प्रकारे आपले बँकेचा गौरवच आहे. त्याचप्रमाणे आपल्या बँकेला तीन आँफसाईट एटीएम सुरू करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली आहे. देशातील हे एकमेव उदाहरण आहे.
आपल्या बँकेकडे आता 26 एटीएम आहेत. त्यापासून आपल्याला चांगले आर्थिक उत्पन्नही मिळत आहे. आगामी काळात शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने बँकेच्या प्रत्येक शाखेच्या परिसरात ग्राहकांसाठी विविध कार्यक्रम घेण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. 2017 मध्ये बँकेतील कर्मचा-यांचे वेतन पुनर्निश्चितीकरण केले आहे. कोव्हीडमध्ये सर्व कर्मचा-यांना सर्व दिवसांचे वेतन, वार्षिक वेतनवाढ एकाही रूपयाची कपात न करता दिले आहेत असे चंद्रकांत काळे सांगितले.
माजी अध्यक्ष अरूण देव म्हणाले, स्व. शंकरराव अभ्यंकर यांच्यामुळे मला बँकेत संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तसेच स्व. पोपटलाल ओसवाल यांच्या सततच्या सहकार्याने बँकेची प्रगतीपथाकडे वाटचाल सुरू ठेवता आली. सध्याचे संचालक मंडळ चांगल्या पध्दतीने काम करीत आहे. 85 ते 1995 या काळात आपल्या बँकेने सर्वप्रथम घरबांधणी कर्ज योजना सुरू केली. त्यामुळे अनेकांना स्वतःचे हक्काचे घर मिळाले. शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने सभासदांचे समाधान होईल अशी भेटवस्तू किंवा बोनस शेअर्स देण्याचे नियोजन संचालक मंडळाने करावे. गेल्या दोन वर्षांत कोरोना रोगाचे प्राबल्य असूनही बँकेने चांगला नफा कमविला आहे, ही खूप चांगली बाब आहे.
डाँ. मधुसुदन मुजुमदार यांनी पूर्वीपासूनच रिझर्व्ह बँकेची धोरणे सहकारी बँकांना त्रासदायक स्वरूपाची असल्याचे सांगितले. वडाचे झाड लहान असते वादळ वा-यातही ते तगून राहते याप्रमाणे आपल्या बँकेने प्रगती केली आहे.
अँड. सूर्यकांत खामकर म्हणाले, मला कायद्याचा अभ्यास असल्यामुळे बँकेच्या संचालक मंडळ सभेतील विषय आम्ही कायदेशीररित्या तपासून पाहायचो. 1990 सालापासून संचालक व 2009-10 मध्ये अध्यक्षपदाच्या काळात विविध नावीण्यपूर्व उपक्रम राबविण्याची संधी मिळाली, सीसीटिव्ही, कर्मचारी गणवेश आदी उपक्रम व बदलत्या काळाबरोबर बँकेच्या कारभाराची घडी बसविण्याची संधी मिळाली. बँकिंग कामकाज करीत असताना खूप दक्ष राहावे लागते. सध्याच्या काळात बँकिंगमध्ये खूप बदल होत आहेत. कोरोनासारख्या अडचणीच्या काळामध्येही बँकेने चांगली प्रगती केली आहे, असेही अँड. खामकर म्हणाले.
माजी अध्यक्ष सीतारामपंत जोशी यांनी बँकेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने सहकार भूषण पुरस्कार सुरू करावा अशी सूचना केली. माजी अध्यक्ष सतीश शेंडे यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल व 2000 कोटींचा व्यवसाय पूर्ण केल्याबद्दल गुलाबपुष्प देऊन बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत काळे यांचे अभिनंदन केले. तसेच आपल्या कालावधीतील आठवणी सांगितल्या.
बँक चालवित असताना त्वरीत निर्णय घेणे गरजेचे असते. आपल्या काळापासून बँकेचे विविध विभाग कार्यान्वित झाल्याचे त्यांनी सांगितले. कोव्हीड काळात बँकेने शासनाला आँक्सीजन सिलेंडर, बेड, काँट याबाबतची मदत केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
माजी उपाध्यक्ष अँड प्र. ल. सोनपाटकी म्हणाले, शताब्दी महोत्सव हा ऐतिहासिक सोहळा आहे. बँकेचे संस्थापक मंडळ यांनी जे ध्येय ठेवून बँक सुरू केली. ते पूर्ण करण्याची संधी आपल्याला मिळत आहे, ही खूप अभिमानास्पद बाब आहे. आपल्या बँकेचे अतिशय उत्साही अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे हे बँकिंग, आयकर व सहकारातील तज्ञ आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने मोठी प्रगती करून कमी कालावधीत 2000 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. बँकेचे भागभांडवल व कासा डिपाँझिट वाढविण्यासाठी आम्ही आमच्या काळात आग्रही राहिलो होतो. बँकेने प्रगतीचे अनेक टप्पे गाठावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बँकेचे माजी उपाध्यक्ष श्री. विवेक पटवर्धन म्हणाले, सर्वांनी एकत्रितपणे काम केले तर सहकारासाठी फायदेशीर आहे. बँकेतील कर्मचा-यांचा सर्वांशी थेट संपर्क असतो. त्यांच्यामुळेच गेल्या 100 वर्षांत बँकेला चांगली प्रगती करता आली आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या कोणत्याही संचालकाने गैरवर्तन केले नाही, त्यामुळे बँकेचा नावलौकीक कायम टिकून आहे, असे सांगितले.
माजी अध्यक्ष कांतीलाल जैन, माजी उपाध्यक्ष सुनील शिंदे यांनीही बँकेला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संचालक अँड. सीए. राजगोपाल द्रवीड, प्रा. विष्णू खरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. संचालक विद्याधर तावरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालक डाँ. विनय जोगळेकर, श्री. मदनलाल ओसवाल, अँड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, मनोज खटावकर, भालचंद्र देशपांडे, डाँ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, सौ. अंजली शिवदे, सौ. गीता कोठावळे, सी.ए. किशोरकुमार मांढरे, श्री. अनिल देव आदी उपस्थित होते.











