विशाल कदम:- महान्यूज लाईव्ह
पुणे : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवा़डी, उरुळी कांचनसह परिसरातील गावांच्या स्मशानभुमितुन, अंत्यसंस्कारानंतर उरलेल्या राखेतुन सोने शोधण्यासाठी मृतदेहाची राख व अस्थी मध्यरात्री पळवुन नेण्याच्या घटना घडु लागल्या आहेत. यामुळे पुर्व हवेलीमधील नागरीकांना आपल्या आप्तईष्ठांच्या अस्थीविसर्जन या विधीला मुकावे लागत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
पुरुष असो वा स्त्री, हिंदु धर्मात अंत्यसंस्करानंतर अस्थी विसर्जन हा विधी फार महत्वाचा व धार्मिक मानला जातो. परंतु, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावांच्या लोणी कॉर्नर येथील सामाईक स्मशानभूमीतुन अंत्यसंस्कार झाल्यानंतर राखेतील सोने शोधण्यासाठी मृतदेहाची राख व अस्थी मध्यरात्री पळवुन नेण्याच्या घटना मागील काही महिणन्यांपासून वारंवार घडत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
अस्थीविसर्जन हा विधी सर्वच नागरीकांच्या दृष्ट्रीने धार्मिक बाब असल्याने, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींनी मृतदेहाची राख व अस्थी पळवापळवी होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी करावी वरील दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील नागरीकांनी केली आहे.
पुर्व हवेलीत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन अशी आर्थिकदृष्ट्या सधन गावे आहेत. दोन्ही ग्रामपंचायती पुणे शहराच्या शेजारी असल्याने परिसरात नागरीकरणाचा वेग प्रचंड आहे. परिणामी येथे मृत्यू पावणा-या नागरिकांची संख्याही मोठी असते. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात परिसरातील बरेच नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यातील काही नागरिक करोनामुळे मृत्यू पावले आहेत. तर काही नागरिक वृदधापकाळाने किंवा इतर आजाराने मरण पावले आहेत.
याबाबत अधिक माहिती देतांना कदमवाकवस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल वेदपाठक म्हणाले, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या ग्रामपंचायतींसाठी पुणे-सोलापूर महामार्गालगत लोणी कॉर्नरला असलेल्या स्मशानभूमीतून मागील काही महिन्यांपासूनपासून मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर रात्री या मृतदेहाची राख व अस्थी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
मृतदेह जर महिलेचा असेल तर स्मशानभूमीतील राख व अस्थी चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. नागरीकांना सुरवातीला वरील प्रकार चुकून झाला असेल असे वाटत होते, म्हणून नागरिकांनी या घटनेकडे दूर्लक्ष केले. परंतू आता हे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांच्या घरातील महिला मरण पावली असेल, तर हा प्रकार सहसा होत नाही. परंतू जर बाहेरगावाहून येऊन येथे रहाणा-या कुटुंबातील महिला असेल तर नक्कीच मृतदेहाची राख व अस्थी चोरुन नेण्याचे प्रकार घडत आहेत. या संदर्भात लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही सधन ग्रामपंचायतींनी या संदर्भात प्रतिबंधक उपाय योजून या घटना बंद कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत बोलतांना लोणी काळभोरचे सरपंच राजाराम काळभोर व उपसरपंच ज्योती काळभोर म्हणाल्या, स्मशानभूमीतून मृतदेहाची राख व अस्थी पळवापळवी बाबतच्या तक्रारी वाढलेल्या आहेत अंत्यसंस्कार झाल्यानंतर अस्थी विसर्जन हा विधी फार महत्वाचा व धार्मिक असल्याने, वरील प्रकारच्या घटना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने त्वरीत प्रतिबंधक उपाय योजना करण्यात येणार आहेत. या ठिकाणी उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकार बंद होतील.











