बारामती : महान्यूज लाईव्ह
मुंबई – हैदराबाद हायस्पीड रेल्वे बारामती- इंदापूरातून जाणार या माहितीमुळे सध्या अनेक गावांतील शेतकरी वेगवेगळ्या चर्चा करीत आहेत. येत्या २१ मे नंतर या रेल्वेमार्गाचे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. मात्र अगोदर दौंड तालुक्यातून जाणारा हा रेल्वेमार्ग रेल्वे मंत्रालयाने का बदलला असावा? याचीच चर्चा सध्या अधिक रंगली आहे.
मुंबई हैदराबाद हायस्पीड रेल्वेचा हा मार्ग ७६७ किलोमीटरचा आहे. तो महाराष्ट्र तेलंगणा व आंध्रप्रदेशातून जात असून यामध्ये ११ स्टेशन्स असणार आहेत. या रेल्वेचा अधिकतम वेग हा ३५० किलोमीटर प्रतितास वेगाचा असून सरासरी २५० किलोमीटर प्रतितास वेग या रेल्वेचा राहणार आहे.
या रेल्वेत एकावेळी ७५० प्रवासी असतील. तर या रेल्वेमार्गावर भूकंपाची अगाऊ माहिती देणारी यंत्रणा कार्यान्वित असेल. विशेष म्हणजे या रेल्वे मार्गासाठी आताच नाही, तर मागील दोन वर्षापासून रेल्वे मंत्रालयाकडून सर्वेक्षणे सुरू आहेत. त्यापैकी रेल्वे मंत्रालयाने एक मार्ग निश्चित केला. त्यामध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, नवी मुंबई (नवी मुंबई विमानतळाजवळ), लोणावळा, पुणे, कुरकुंभ, दौंड, अकलूज, पंढरपूर, कलाबुर्गी (गुलबर्गा), झहिराबाद व शेवटी हैदराबाद अशी ११ स्टेशन्स असणार होती. अजूनही संकेतस्थळावर नियोजित मार्ग हाच आहे.
याची सुरवात मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कॉरिडॉरमधील ५०८ किलोमीटरजवळून होणार होती. मंत्रालयाच्या संकेतस्थळावर सध्या असलेल्या नकाशानुसार हा मार्ग निश्चितही करण्यात आला. मात्र त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने पुन्हा नव्याने सर्वेक्षणाचे आदेश दिले आणि त्यानुसार हा मार्ग आता नव्याने कुरकुंभ नव्हे, तर कुरकुंभपासून तब्बल ३० किलोमीटर अंतरावरील बारामती, इंदापूरच्या भागातून जाणार आहे. हा नवा मार्ग का आखण्यात आला? याची चर्चा सध्या रंगली आहे. याची वस्तुनिष्ठ माहिती अद्यापही सांगितली जात नाही. हे सारे गुपित ठेवण्यात आले आहे. मात्र त्यामागील अनेक पर्यायांचा विचार सध्या केला जात असून त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या चर्चा झडू लागल्या आहेत.
दरम्यान या विषयाशी संबंधित एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार नियोजित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची आखणी पुणे जिल्ह्यातच पुरंदर तालुक्यात होत आहे. त्या दृष्टीनेही हा नवा मार्ग आखण्यात आला असून कुरकुंभमार्गे हा लोहमार्ग सुव्यवस्थित व सरळ नाही. शिवाय दौंड तालुक्यात अगोदरच लोहमार्गाचे जाळे आहे, मात्र पुणे- बारामती, पंढरपूर, सोलापूर हा मार्ग नसल्याने या ठिकाणची निवड करण्यात आली आहे. दरम्यान येत्या २१ मे नंतर या मार्गाचे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. मात्र संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गानंतर आता या बुलेट ट्रेनच्या रेल्वेमार्गाने इंदापूर, बारामती, पुरंदर, अकलूज भागात मोठी खळबळ उडवून दिली आहे.