माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – भोर तालुक्यात गेल्या आठवड्यापासून उन्हामुळे जीवाची काहिली होत असताना आज दुपारी भोर तालुक्यात बहुतांश ठिकाणी जोरदार गारांचा पाऊस पडल्याने नागरिकांना दिलासा मिळाला, तब्बल दिड तास झालेल्या पावसामुळे मात्र उन्हाळी पीक हे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झाले. दरम्यान याचे गांभीर्य ओळखून भोर तहसिलदार अजित पाटील यांनी तातडीने पंचनामा करण्याचे सूचना दिल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसापासून उन्हामुळे नागरिक हैराण होते. अचानक आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले की, शेतकर्यांना पिकांची नुकसान होण्याची धास्ती कायम राहत असतानाच अचानक विजेच्या कडकडाटसह गारांचा पाऊस पडल्याने शेतातील कामे सुरू असताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
वादळी पावसामुळे तालुक्यातील ऊस, टोमेटो, वांगी तसेच काही ठिकाणी काढणी आलेले ज्वारीसह पालेभाज्याचे नुकसान झाले आहे. अनेक अल्प भूधारक शेतकऱ्यांचे जीवन उन्हाळी हे पिकावर अवलंबून असून वर्षभर आर्थिक बाबीवर कसरत करावी लागत असल्याची माहिती कृषीकन्या निकिता बांदल हिने सांगितले. तर शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडूनही केले जात आहे.
भोर शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. जोरदार अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतातील टॉमेटो, वांगी, कांदा, ज्वारी उन्हाळी भुईमुग, बाजरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचेही नुकसान झाले असून गारपीटमुळे कलिंगड पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. तालुक्यातील भिलारवाडी, जांभळी, निधान- सांगवी व शिवगंगा नदीच्या खोऱ्यातील केळवडे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाचा फटका इंगवली, कामथडी, कापूरहोळ, हातवे, सणसवाडी, तांबाड, माळेगाव, सांगवी आदी गावात बसला. येथे अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. काही ठिकाणी राहिलेली ज्वारी पिकांची काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एप्रिल महिना अंतिम टप्प्यात आला असताना अवकाळी पाऊस सुरु झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. आज दुपारी सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात सायंकाळी साडेचार पर्यंत बरसत होता. यामध्ये अनेक ठिकाणी गारपीट झाली.
दरम्यान, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यामधून केली जात असून तत्पूर्वीच तहसीलदार अजित पाटील यांनी नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामा करण्याच्या सूचना केल्याची माहिती दिली.
अजूनही ब्रिटिशकालीन महसूल पद्धत..
शासनाने ६१ पैसे आणेवारी लावल्यामुळे शेतकरी वर्गात शासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने ५० पैसे पेक्षा कमी असणारी आणेवारी लागू करावी असे शेतकरी सांगत आहेत. तर पीक नुकसान भरपाईसाठी महसूल पद्धत अजूनही ब्रिटिश कालीन आहे, त्यात काही प्रमाणात दुरुस्ती झाली. मात्र या कालबाह्य आणेवारी पद्धतीचा, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा हा योग्य होत नाही. अधिवेशनात, विशेष पॅकेज सरकार जाहीर करते, मात्र आणेवारी पद्धतीत काही सुधारणा करत नाही.