इंदापूर : महान्यूज लाईव्ह
गेल्या पंचवीस वर्षापासून ज्या गोष्टींचे भिजत घोंगडे पडले होते, तो इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे पासून बेडशिंगे गावापर्यंतच्या 36 गावांच्या उन्हाळी आवर्तनाचा प्रश्न सुटला असून, नीरा डावा कालव्यावरील 22 गावांचा पाणी प्रश्न देखील सुटला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उजनी जलाशयातून पाच टीएमसी पाणी उचलण्यास परवानगी देणाऱ्या राज्य शासनाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्रालयाने या संदर्भातील निर्णय जाहीर केला आहे.
जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यासंदर्भात आज माहिती दिली. गेली पंचवीस वर्ष लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेचा पाणीप्रश्न प्रलंबित होता. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात बाराशे कोटींची तरतूद करत या उपसा सिंचन योजनेचा समावेश यामध्ये केला आणि तरतूद केली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यातून यश मिळाले असून, इंदापूर तालुक्यातील वर्षानुवर्ष पाणी समस्येचा सामना करणाऱ्या गावांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही महिन्यांपासून दत्तात्रय भरणे यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता. या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अंतिम स्वाक्षरी होणे बाकी होते, ती स्वाक्षरी देखील झालेली आहे, त्यामुळे कुंभारगाव परिसरातील उजनी जलाशयातून दहा हजार अश्वशक्तीचा विद्युत पंपाद्वारे हे पाणी उचलले जाणार असून ते दहा किलोमीटर अंतरावरील शेटफळगडे परिसरात खडकवासला कालव्यात सोडले जाणार आहे. हे पाणी खडकवासला कालव्यातून बेडशिंगे गावापर्यंत शेती सिंचनासाठी वापरले जाणार आहे, तर सणसर जोड कालव्यातून ते पाणी नीरा डावा कालव्यावरील 22 गावातील शेती सिंचनासाठी वापरले जाणार आहे. या योजनेसाठी 600 कोटी रुपयांचा खर्च होणार असून, दोन वर्षात ही योजना पूर्णत्वास जाणार आहे. तालुक्यातील या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाल्याने, चार महिन्यात या योजनेचा सर्व्हे पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर लाकडी निंबोडीचा ही महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.