बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्यात आणि देशात पुन्हा एकदा कोरोना वाढू लागल्यानंतर मध्यंतरीच्या कोरोना च्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीस मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सत्र व प्रथमवर्ग न्यायालयांचे कामकाज प्रत्येकी अडीच तासांच्या दोन शिफ्टमध्ये करण्याचे आदेश दिले होते. आता पुन्हा कोरोना वाढू लागल्याने हे कामकाज फक्त अडीच तासांमध्येच पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
यामध्ये न्यायालयातील पन्नास टक्के कर्मचारी उपस्थित राहतील अशा सूचना दिल्या असून, सकाळी अकरा ते दुपारी दीड या अडीच तासांच्या काळातच कामकाज सुरू होणार आहे. यामध्ये देखील जी प्रकरणे महत्त्वाची नाहीत, त्यांना लगेच तारखा मिळणार नाहीत. याखेरीज ज्या खटल्यांची तातडीची सुनावणी असेल, त्याच पक्षकार आणि वकील यांना न्यायालयात प्रवेश मिळणार आहे.
ज्या खटल्यामध्ये युक्तिवाद पूर्ण झालेले आहेत त्याच खटल्यांचे निकाल देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सोमवारपासून न्यायालय सुरू झाल्यानंतर फक्त अडीच तासच कामकाज सुरू राहील. न्यायालयाच्या आवारातील उपहारगृहे व वकिलांच्या बार रूम या दरम्यान बंद राहतील. न्यायाधीश हे वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी हजर हजर नसतील तर विरोधातील आदेश देणार नाहीत आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये फक्त आरोपींचे रिमांड, जामीन आणि फौजदारी व दिवाणी मधील तात्काळ आवश्यक असलेल्या खटल्यांची सुनावणी होईल.
अर्थात जिल्हास्तरावरील मुख्य व सत्र न्यायालय तेथील प्राप्त परिस्थितीनुसार कामकाजाच्या वेळा संदर्भात निर्णय घेतील. न्यायालयाचे सर्व अधिकारी त्यांच्या हेडकॉटर किंवा त्यांची राहण्याची ठिकाणी परवानगीशिवाय सोडणार नाहीत. सर्व न्यायालये प्रत्येक शनिवारी बंद राहतील, परंतु रिमांड आणि तात्काळ प्रकरणे असतील त्यावरच्या सुनावण्या घेऊ शकतील. न्यायाधीश कोणत्याही प्रकारचे आदेश जारी करणार नाहीत, ज्या प्रकरणांमध्ये वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी हजर नसतील. अशा प्रकारचे आदेश उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल एस.जी.दिघे यांनी दिले आहेत.