बारामती : महान्यूज लाईव्ह
मागील वर्षी गावातील एखाद्या गल्लीत कोरोनाचा कुठे एक रुग्ण गावात आढळत नाही, तोच संपूर्ण गाव औषध फवारणीने निर्जंतुकीकरण केले जात होते. त्याच ग्रामपंचायती आता गावात ढीगभर कोरोनाचे रुग्ण आढळत असताना, आता मात्र निर्जंतुकीकरणाला काहीच महत्त्व देत नाहीत. मागील वर्षाचे हे सगळे सोपस्कार फक्त तोंडावर आलेल्या निवडणुकीपुरते होते की काय अशी शंका आता येऊ लागली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आता मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येऊ लागल्याने आता खरी गावांच्या निर्जंतुकीकरणाची गरज आहे. त्याचबरोबर गावांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर ऑक्सीमीटर आणि थर्मल गन घेऊन फिरणाऱ्या आशा स्वयंसेविका किंवा स्वयंसेवक यांची खरी आता गरज आहे. आरोग्य यंत्रणेला पाठबळ देणारी योजना, हीच कोरोनाच्या नियंत्रणामध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान आणि मोलाची भर घालणारी ठरणार आहे, मात्र अशा वेळेस ग्रामपंचायतींनी हात आखडता घेतला आहे.
पूर्वी ग्रामपंचायतीच्या एका गल्लीत जरी कोरोनाचा रुग्ण आढळला, तरी संपूर्ण ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात फवारणीचे ट्रॅक्टर फिरवले जायचे. अथवा फवारणी करणारे कर्मचारी सर्व भागात फिरून निर्जंतुकीकरण करत होते. आता मात्र निर्जंतुकीकरणाला काहीच महत्त्व दिले जात नसून ग्रामपंचायतींकडून सर्वेक्षणाचे काम स्वयंस्फूर्तीने होताना दिसत नाही. मागील वर्षी निवडणुका देखील जवळ आल्या होत्या. काही ठिकाणी निवडणुकांसाठी सदस्यांचा कालावधी देखील पूर्ण झाला होता. अशा परिस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये ही उत्साह होता. तोच उत्साह आताही दाखवण्याची गरज आहे. लोकांना आता याची गरज आहे. त्याच बरोबर मनुष्यबळाची कमतरता असणाऱ्या आरोग्य यंत्रणेला देखील हातभार लावण्याची गरज आहे.